माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ईडीकडून अटक

2100 कोटींचा मद्य घोटाळा

-निवासस्थानी छाप्यानंतर कारवाई
भिलाई  / 18 जुलै : छत्तीसगडमधील बहुचर्चित मद्य घोटाळा प्रकरणात आज माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली आहे. ईडीने बघेल कुटुंबाच्या भिलाई (जिल्हा दुर्ग) येथील निवासस्थानी छापेमारी केली आणि त्यानंतर अटकेची ही कारवाई करण्यात आली.
हा तपास मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुरू आहे आणि ईडीच्या हाती नवीन पुरावे लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. याआधी देखील मार्च महिन्यात ईडीने चैतन्य बघेल यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. या प्रकरणात त्यांच्यावर मद्य घोटाळ्याच्या पैशांपैकी काही रक्कम प्राप्त झाल्याचा संशय असल्याची माहिती ईडीने दिली होती. छाप्याच्या वेळी बघेल कुटुंबाच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घराबाहेर जमून निषेधही केला.
याप्रकरणी प्रतिक्रिया देताना भूपेश बघेल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, ईडी आमच्या भिलाई येथील निवासस्थानी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दाखल झाली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडमधील या कथित मद्य घोटाळ्यामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसला असून, 2100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहारामध्ये मद्य सिंडिकेटने अपार संपत्ती जमा केली असून, या पैशाचा काही भाग चैतन्य बघेल यांच्याकडे पोहोचल्याचा संशय आहे.
हा प्रकार काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून, राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या कारवाईचे स्वागत करताना काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा एकदा केले तर काँग्रेसने यामागे राजकीय सूडभावनेचा आरोप केला आहे. सध्या चैतन्य बघेल यांची चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे प्रकरण अजूनही विकसित होत आहे आणि अधिकृत तपशीलांची प्रतीक्षा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button