भाजपा व युवा स्वाभिमानमध्ये मैत्रीपूर्ण लढत
मनपा निवडणुकीच्या पार्शभूमीवर चर्चेचे गुर्हाळ

* आ.रवी राणांच्या फार्म हाऊसवर बावनकुळे यांची चर्चा
* दोन्ही पक्षाचे दिग्गजनेते बैठकीला उपस्थित
* अखेच्या दिवशी अनेक ठिकाणी तिढा कायम
अमरावती /2 जानेवारी : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर आणि शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी शुक्रवारी आमदार रवी राणांच्या फार्म हाऊसवर भेट देऊन चर्चा केली.
भाजपने युवा स्वाभिमान पक्षासाठी 9 जागा राखून ठेवल्या होत्या, मात्र युवा स्वाभिमानने 41 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या विरोधात रवी राणांनी सचिन भेंडे यांना उमेदवारी दिली. सचिन भेंडे हे महापालिकेचे कंत्राटदार असून निवडणुकीसाठी अपात्र ठरतात, अशी तक्रार तुषार भारतीय यांनी केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकार्यांनी भेंडेंची उमेदवारी कायम ठेवली आणि भारतीय यांनी नंतर न्यायालयात याचिका मागे घेतली. त्यामुळे सचिन भेंडे रिंगणात कायम आहेत. निवडणूक क्षेत्रात काही जागांवर भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार समोरासमोर आल्याने मतविभाजनाचा धोका लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी युवा स्वाभिमान पक्षाला माघार घेण्याचे प्रयत्न केले. या भेटीवेळी रवी राणांसोबत दीड तासांहून अधिक चर्चा झाली, तरीही दोन्ही पक्षांमध्ये कोणताही तोडगा साधला जाऊ शकला नाही.युवक स्वाभिमान पक्षाने ही माहिती जाहीर केली आहे की, त्यांनी आपले उमेदवार माघार घेतली नाहीत आणि आगामी निवडणुकीत भाजपशी मैत्रीपूर्ण परंतु सामना करणारी लढत सुरू राहणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, ही मैत्रीपूर्ण लढत मतदारांच्या पसंतीवर मोठा प्रभाव टाकणार आहे.




