…तर रेल्वे धावणार नाही

बच्चू कडू यांचा इशारा

नागपूर/19 फेब्रुवारी – राज्य सरकार कर्जमुक्तीसाठी कामाला लागल्याचे समजते आनंदाची गोष्ट आहे. मात्र कर्जमुक्तीसाठी 30 जूनपर्यंत आम्ही वाट पाहू नाहीतर महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक धावू देणार नाही असा इशारा शेतकरी नेते, प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिला. नागपूरला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोठे चक्काजाम आंदोलन झाले. त्यानंतर मुंबईत शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनुसार 30 जून पर्यंत कर्जमुक्तीची घोषणा राज्य सरकारने केली. आता ही डेडलाइन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार पाळणार का, असा प्रश्न कडू यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, गट सचिवांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची सर्व कागदपत्रे आम्ही सरकारकडे दिली. मात्र सरकार कर्जमुक्ती करणार असताना चालू वर्षाची कर्जमुक्ती करणार का, याविषयीचा संभ्रम कायम आहे. दुष्काळ पडल्याशिवाय कर्जमाफी कशी करता येईल अशी सरकारची भूमिका होती. मुख्यमंत्री देवाभाऊ स्वतःच बोलले आणि फसले. 2025- 26 चालू वर्षातील कर्ज माफ होणे गरजेचे आहे. विदर्भ, मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला. या दिवसात मोठी हानी झाली. 2018 मध्ये सोयाबीनचे भाव चार हजार होते. 2026 मध्ये साडेतीन हजार रुपये सोयाबीन विकावी लागली. कापूस फक्त पाचशे रुपयांनी भाव वाढले खरेदी केंद्र बंद केले. कापसाचे भाव पुन्हा हजार रुपये कमी झाले. शेतमालावर प्रचंड परिणाम होत आहे. हे वर्ष दुष्काळाचे वर्ष आणि हमीभाव न भेटणारे वर्ष त्यामुळे चालू वर्षाची देखील कर्जमाफी करावी लागेल. कुपोषनग्रस्त भागात चार महिने मजुरांचे पैसे मिळालेले नाहीत. लवकर न्याय न मिळाल्यास नागपुरातील रोजगार हमी योजना आयुक्तालय आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा कडू यांनी दिला. यासोबतच भाजप सरकारला आठवण करून देण्यासाठी मेळघाटच्या भूमित 2 ते 9 मार्च ही संघर्ष पदयात्रा आम्ही काढत आहोत. गांधीजींच्या मार्गाने आमची यात्रा असली तरी भगतसिंगांच्या मार्गानेही आम्ही जाऊ शकतो असा इशारा सरकारला दिला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वर्षभरात मेळघाटचा आढावा घेत नाहीत. दौरा करीत नाहीत. केवळ रेती घाटाकडे त्यांचे लक्ष असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.

संबंधित बातम्या

Back to top button