सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा
वडेट्टीवार म्हणाले, ते उद्योगपतीच, ही 100 कोटींची निवडणूक

नागपूर/25 मे-आगामी विधानपरिषद निवडणुकीत चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेच्या जागेवरुन भाजप सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आपल्या लेकीच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासोबत मुलगी रेवती सुळे आणि जावई सारंग लखानी हे उपस्थित होते. त्यानंतर भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीत अरुण लखानी यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चेने आणखीनच जोर धरला आहे. याबाबत सोमवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. अरुण लखानी असू देत किंवा कुठल्या दुसरे उद्योगपती असू देत, शेवटी ते उद्योगपतीच आहेत. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्या बाहेरच्या आहेत. किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आमच्या आवाक्याच्या बाहेरच्या दिसत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. अलीकडे विधानपरिषद निवडणुका म्हणजे उत्सव झाला आहे. आमच्या संपर्कातही भाजपचे 100 नगरसेवक आहेत. त्यांच्यातही अंतर्गत वाद आहेत. पण आम्ही या घोडेबाजारापासून आणि फोडाफोडीपासून लांब आहोत. विधानपरिषदेच्या प्रत्येक मतासाठी 15 लाखांचा रेट ठरला आहे. काही नगरसेवकांना पाच लाख रुपयांचे टोकन देऊन उचलण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे निष्पक्ष निवडणुका होणे आणि योग्य माणसाची निवड होणे दूरच राहिले. अशा निवडणुकांमध्ये व्यापारी आणि उद्योगपती पैसे गुंतवतात. अशाने भविष्यात विधानपरिषद निवडणुका या कंत्राटदार आणि उद्योगपतींच्या हातात जातील. सामान्य माणूस भविष्यात विधानपरिषदेत दिसणार नाही. एका मतासाठी 15 लाखांचा रेट आहे. नगरसेवकांना इतके पैसे मिळाल्यानंतर त्यांना दिवाळी आहे वाटतं. या सगळ्यामुळे लोकशाही शिल्लक राहील की नाही, हा प्रश्न पडतो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.




