‘सम्राट’ सरकारमध्ये खातेवाटप जाहीर
मुख्यमंत्र्यांकडे गृहखात्यासह तब्बल 29 खाती

जेडीयूच्या वाट्याला 18 खाती, उपमुख्यमंत्र्यांकडे मोठी जबाबदारी
पटना/15 एप्रिल– बिहारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. या नव्या रचनेत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व दिसून येत असून, स्वतः मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी गृह विभागासह तब्बल 29 महत्त्वाची मंत्रालये आपल्याकडे ठेवली आहेत. मित्रपक्ष असलेल्या जेडीयूच्या (गऊण) वाट्याला सध्या 18 विभाग आले आहेत.
नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी प्रशासनावर पकड मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची खाती स्वतःकडे घेतली आहेत. त्यांच्याकडे गृह मंत्रालय, सामान्य प्रशासन, नगरविकास, आरोग्य, कृषी आणि उद्योग, रस्ते बांधकाम यांसह महत्वाचे 29 विभाग ठेवण्यात आले आहेत. मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. विजय चौधरी यांच्याकडे एकूण 10 विभाग सोपवण्यात आले आहेत. यात जलसंपदा, शिक्षण, ग्रामीण विकास, संसदीय कार्य आणि परिवहन यांसारख्या विभागांचा समावेश आहे. तर बिजेंद्र यादव यांच्याकडे 8 विभागांची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे ऊर्जा, वित्त (अर्थ), नियोजन आणि विकास, समाजकल्याण आणि वाणिज्य-कर ही महत्त्वाची खाती असतील.




