आता सगळ्या स्मार्टफोनमध्ये सरकारी अॅप असणार
इच्छा असूनही डिलीट करता येणार नाही

* चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यात होणार मदत
नवी दिल्ली/2 डिसेंबर : भारत सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये सरकारी सायबर सेफ्टी ऍप इन्स्टॉल करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. हे ऍप मोबाईल वापरकर्त्यांना डिलिट करता येणार नाही, याची काळजी मोबाईल कंपन्यांना घ्यायची आहे.
भारतीयांना त्यांच्या मोबाईलमध्ये लवकरच एक सरकारी ऍप प्री इन्स्टॉल असलेलं दिसेल. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयानं स्मार्टफोन निर्मिती करणार्या कंपन्यांना या संदर्भात आदेश दिले आहेत. मोबाईलमध्ये सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षा देणारं सरकारी ऍप इन्स्टॉल करा. हे ऍप डिलिट करता येणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र मंत्रालयानं अद्याप तरी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 112 कोटींच्या घरात जाते. भारत जगातील सर्वात मोबाईल निर्माता आहे. भारत सरकारकडे संचार साथी ऍप आहे. हे सरकारी ऍप मोबाईलचं सायबर धोक्यांपासून सुरक्षा देतं. मोबाईलची चोरी रोखण्यात, बोगस फोन काळ्या बाजारात विकण्यापासून रोखण्याचं काम संचार साथी ऍप करतं. सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार, या ऍपच्या मदतीनं आतापर्यंत चोरीला गेलेले किंवा हरवलेले 7 लाख मोबाईल सापडलेले आहेत. यातील 50 हजार मोबाईल एकट्या ऑक्टोबरमध्ये परत मिळाले आहेत. दूरसंचार विभागानं 2023 मध्ये संचार साथी ऍप लॉन्च केलं होतं. सरकारनं 28 नोव्हेंबरला आदेश काढला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. नवीन ऍप इन्स्टॉल करण्यासाठी कंपन्यांना 90 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. संचार साथी ऍप नव्या मोबाईलमध्ये प्री इन्स्टॉल असेल याची खात्री मोबाईल कंपन्यांना करावी लागेल. हे ऍप डिसेबल किंवा डिलिट करता येणार नाही, याची काळजीदेखील कंपन्यांना घ्यावी लागेल. जे स्मार्टफोन आधीपासूनच वापरात आहेत, त्या मोबाईलमध्ये संचार साथी ऍप इन्स्टॉल व्हावं यासाठी मोबाईल कंपन्यांना एक सॉफ्टवेअर अपडेट द्यावं लागेल. यानंतर वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये संचार साथी ऍप इन्स्टॉल होईल.




