विखे पाटलांची गाडी फोडा, 1 लाख रुपये बक्षीस मिळवा
बच्चू कडूंची घोषणा, कर्जमाफीच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन जोरदार टीका

मुंबई /9 नोव्हेंबर : राज्यातील नेते शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून गेल्या काही काळापासून वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारखीच मदत मिळणार नाही, असे वक्तव्य कर्जमाफीवरून केले होते. यानंतर आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीवरून मुक्ताफळे उधळली आहेत. आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची. हे अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत. याप्रकरणी प्रहार जनसंघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडणार्याला बक्षीस जाहीर केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी म्हटले की, जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल, त्याला माझ्याकडून एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. तसेस मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार, असा इशारा देतानाच बच्चू कडू म्हणाले की, नाव राधाकृष्ण आणि कृत्य मात्र कंसाचं करायचे असेल, तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे. कारण देवेंद्र फडवणीस एकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात. तर दुसरीकडे हे वाचाळवीळ मंत्री असे वक्तव्य करतात. शुकरमाना की, लोक तुम्हाला मारत नाही. त्यामुळे ही नालायकी थांबवा, अशा शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. महायुती सरकार 100 टक्के कर्जमाफी करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री कर्जमाफीविरोधात वक्तव्य करून महायुती सरकारला अडचणीत आणत आहेत. या मालिकेत आता राधाकृष्ण विखे पाटील यांची भर पडली. ते म्हणाले की, सोसायटीतून आणि बँकेतून कर्ज काढायचे. त्यानंतर कर्ज माफ करून घ्यायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर कर्जमाफी मागायची, ही गोष्ट अनेक वर्ष सुरू आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते.




