लिपिकांपासून अति.जिल्हाधिकार्यांपर्यंत, सर्वांना बढती
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

* पुढच्या काळात आयएएस होण्याचा मार्ग मोकळा
नागपूर /17 ऑक्टोबर : महसूल खात्यात अनेक वर्षांपासून कर्मचारी अधिकार्यांच्या पदोन्नत्या प्रलंबित आहेत. लिपिकापासून अतिरिक्त जिल्हाधिकार्यांपर्यंत राज्यातील सर्व पातळीवर पदोन्नती करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते नागपूर येथे वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधीसोबत बोलत होते. बावनकुळे म्हणाले, महसूल खात्यात 23 अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांना निवड श्रेणी देण्यात आली आणि पुढच्या काळात आयएएस होण्याचा मार्ग मोकळा झाला. सोबतच राज्यात 22 उपजिल्हाधिकार्यांना आता अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली आहे. गेल्या वेळी 68 अतिरिक्त जिल्हाधिकार्यांची निवड केली, आता आम्ही तातडीने तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी यांच्या बढत्या करणार आहोत, नायब तहसीलदार ते तहसीलदार यांच्याही बढत्या होत आहेत. राज्यात गेल्या आठ-दहा वर्षात थांबलेल्या पदोन्नत्या आम्ही करतो आहोत, असे महसूल मंत्री म्हणाले. लिपिकापासून अतिरिक्त जिल्हाधिकार्यांपर्यंत राज्यातील सर्व पातळीवर पदोन्नती करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे, असे ते म्हणाले. मराठा आरक्षण जीआर – मी यापूर्वी सांगितली आहे, सर्वपक्षीय ओबीसी बैठकीत आम्ही स्पष्ट केलं आणि मुख्यमंत्र्यांनी तर जीआर वाचून दाखवला आणि हे सांगितलं, हा जीआर केवळ हैदराबाद गॅझेट आणि 4 जिल्हा पुरता आहे. आम्ही सूचना दिल्या आहेत की, खोडतोड केलेलं चुकीचं प्रमाणपत्र वाटप करू नये, त्याची जबाबदारी निश्चित होईल आणि उद्या व्हॅलिडीटी आहे, त्यामुळे कुठलेही खोटं प्रमाणपत्र तयार होणार नाही. याची काळजी सरकारने घेतली आहे. मी भुजबळ साहेबांनाही समजावलं. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीतही जीआर समजावून सांगितला. त्याचा ओबीसीवर परिणाम होणार नाही. पण भुजबळ साहेबांना अजून काही मुद्यांवर शंका आहे, असे ते म्हणाले.
* दिवाळीच्या सुट्टीत महसूल यंत्रणा काम करणार
अतिवृष्टीने बाधित शेतकर्यांना अद्याप मदत मिळाली नाही,अशी ओरड आहे. याबाबत ते म्हणाले, ज्यांची केवायसी झालेली आहे,अशा शेतकर्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत मिळावी यासाठी सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे. दिवाळीच्या सुट्टीत महसूल यंत्रणा शेतकर्यांना मदत मिळावी यासाठी काम करणार आहे. विरोधी पक्षात असल्याने वाडेट्टीवारांना सरकार विरोधात बोलावे लागते, दिवाळी असल्याने राज्यातील राजकीय वातावरण दुषित होऊ नये म्हणून सर्व पक्षांनी एकत्र येऊन शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहिला पाहिजे. यासाठी काम करणे हे राज्याची प्राथमिकता आहे, असे बावनकुळे म्हणाले.




