बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी नांदगाव पेठ मधून मदतीचा हात

स्व हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट व श्रीराम संस्थेचा उपक्रम

* बीड जिल्ह्यातील मजरथ गावासाठी साहित्य घेऊन वाहन रवाना 

नांदगाव पेठ/12 ऑक्टोबर  : ओल्या दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे जगणेच उद्ध्वस्त झाले असताना, नांदगावपेठमधून एक संवेदनशील मदतीचा हात पुढे आला. स्व. सौ. हिराबाई तुळशीरामजी गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती यांच्या पुढाकाराने आणि श्रीरामचंद्र संस्थान, नांदगाव पेठ यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मजरथ या गावातील शेतकरी बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य घेऊन जाणार्‍या वाहनाला आमदार राजेश वानखडे व मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. या सामाजिक उपक्रमाअंतर्गत 100 गरीब कुटुंबांना किराणा, शालेय आणि संसारोपयोगी वस्तू पाठविण्यात आल्या. अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबांना मदतीचा दिलासा देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. रविवारी श्रीराम मंदिर, नांदगांव पेठ येथे आयोजित कार्यक्रमात मदतीच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून बीडकडे रवाना करण्यात आले. या वेळी आमदार राजेश वानखडे, नीलकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष दीपक गुल्हाने, नितीन गुडधे, मिलिंद पाटील, सुभाष श्रीखंडे, प्रदीप गौरखेडे, शरद बैस, श्रीकृष्ण जीरापुरे, देवघरे, ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शेतकरी संकटात असताना आपण त्यांच्या पाठीशी उभे असावे. शेतकरी आहे म्हणून आपण आहोत, त्यामुळे ही मदत नाही तर आपले कर्तव्य आहे.” या उपक्रमात प्रा. मोरेश्वर इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य भारती गेडाम, निलेश मरोडकर, वीरेंद्र लंगडे, राजेंद्र तुळे, आकाश गुल्हाने, करण मांडवकर, नितीन टाले, गौरव राठोड, तेजस वानखडे, विलास धोटे, संजय कोहळे, सुधीर जाधव, चेतन ठाकरे, सागर खरते, नितीन काळे, मोनिका पिहुलकर, भैया चौधरी, कडू ताई, विजय झटाले तसेच ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टने दाखविलेला हा सहकार्याचा भाव मराठवाड्याच्या मातीत नवी आशा निर्माण करणारा ठरला आहे. “शेतकर्‍यांच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी माणुसकी आहे,” असे आमदार राजेश वानखडे म्हणाले. स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी मदत उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी पुढे म्हटले की, सेवा हीच श्रेष्ठ धर्म असून विवेक गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्ट सातत्याने समाजकार्यासाठी पुढाकार घेत आहे. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही, तर आपल्या भूमी आणि अन्नदात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची खरी भावना आहे. “साहित्य नव्हे तर हा श्रीरामाचा ‘प्रसाद’ आहे,” असे प्रतिपादन श्रीराम संस्थानचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी केले. ते म्हणाले की, “दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी आपण पाठवत असलेले धान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू या केवळ भौतिक वस्तू नाहीत, तर त्या श्रीरामाच्या ‘प्रसाद’ स्वरूपात आहेत. हा प्रसाद म्हणजे करुणा, संवेदना आणि सहभावनेचा दैवी संदेश आहे. ज्या भावनेतून आपण ही मदत करत आहोत, तीच खरी भक्ती आणि माणुसकीची सेवा आहे. प्रत्येक मदतीच्या मागे श्रीरामाचा आशीर्वाद आहे आणि त्या माध्यमातून आपण समाजाशी, शेतकर्‍यांशी आणि राष्ट्राशी आपली नाळ जोडत आहोत.”

संबंधित बातम्या

Back to top button