सिद्धार्थ कॉलेजकडे जाणार्या डीपी रोडवरील अतिक्रमण हटवले
अचलपूर नगरपालिकेची कारवाई

-आठवडी बाजारातील नागरिकांमध्ये संतापाची लाट
अचलपूर /29 मे: अचलपूर शहरातील जयस्तंभ चौक ते बस स्टँड मार्गे सिद्धार्थ कॉलेजकडे जाणार्या डीपी रोडवरील अतिक्रमण अचलपूर पालिका प्रशासनाने हटवले. या कारवाईमुळे माठोडी बाजार परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी अचानक करण्यात आलेल्या या कारवाईला विरोध दर्शवला असून, त्यावर पालिकेने ती नियोजन आणि कायद्यानुसार करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
24 मे रोजी अचलपूर मुख्य रस्त्यापासून सिद्धार्थ कॉलेजकडे जाणार्या सुमारे 20 फूट रुंद रस्त्यावर अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. अनेक वर्षांपासून या मार्गावर दुकानांचे व टपर्यांचे अतिक्रमण होते. परिणामी रस्ता अरुंद झाला होता आणि वाहतूक कोंडीसह विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोठ्या अडचणी येत होत्या. पावसाळ्यात येथे पाणी साचण्याची समस्या सतत निर्माण होत होती.
पालिका प्रशासनाने आधीच नोटिसा देऊन सूचना केल्यानंतर कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई राबवण्यात आली. सुमारे 300 मीटर लांबीच्या भागातील अतिक्रमण हटवण्यात आले. हटवलेली जागा पुन्हा अतिक्रमित होऊ नये म्हणून पालिकेने त्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.
या कारवाईमुळे आठवडी बाजारातील छोटे व्यापारी, पानठेले, ऊस रस विक्रेते, भाजी विक्रेते, फेरीवाले यांना मोठा फटका बसला आहे. पालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था न देता अचानक दुकान हटवल्यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, हे अतिक्रमण नवीन नव्हते, अनेक वर्षांपासून तेथे दुकाने सुरू होती, त्यामुळे अचानक केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे.
पालिका प्रशासनाच्या मते, संबंधित रस्ता डीपी रोडमध्ये समाविष्ट आहे व नियोजनानुसार त्याचा वापर नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोकळा ठेवणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसात या भागात पाणी साचून अपघात होत असल्यामुळे रस्त्याचे रूंदीकरण व स्वच्छता करणे अत्यावश्यक होते. त्यामुळे अतिक्रमण हटवून सार्वजनिक हितासाठी योग्य तो निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. सार्वजनिक रस्त्यावरचे अतिक्रमण हटवणे हे प्रशासनाच्या दृष्टीने आवश्यक असले तरी यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे प्रश्न अधिक वाढले आहेत. पुनर्वसन व पर्यायी व्यवस्थेअभावी संतप्त नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला असून, प्रशासनाने यावर समन्वयातून तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.