उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या बॉडीचा 2 दिवस छळ केला

हातांचे ठसे घेतले, नार्को टेस्टची केली मागणी

* रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

मुंबई/3 ऑक्टोबर – एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, असा दावा कदम यांनी केला आहे. त्याचबरोबर निधनानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसेही घेण्यात आले होते, असंही त्यांनी सांगितलं. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर खुद्द रामदास कदम यांनीच स्पष्टीकरण दिलं असून, ते देताना त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. दसरा मेळाव्यातील आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर शरद पवारांचा उल्लेख केला. मी जे बोललो त्यावर ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, ही अतिशय गंभीर बाब आहे. शरद पवार तेव्हा आले होते, पण त्यांनाही मातोश्रीवर वर पाठवलं नव्हतं. कुणालाच वर पाठवलं नव्हतं. तेव्हा शरद पवार म्हणाले होते, ‘अरे मिलींद, उद्धव त्यांच्या मृतदेहाला का त्रास देतोय?’ मला आठवतंय, मी त्यावेळी मातोश्रीवरच होतो, असा दावा कदम यांनी केला.

रामदास कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं, बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे, पण मला असं बोलावं लागतंय. उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर समोर येऊन सांगावं असं काही घडलं नाही. मग मी त्यांना उत्तर देईन. त्यांची सवय आहे इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडायची. काही दिवसांपूर्वी शिवसेनेची उपनेता आली होती. तिनं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी इतकं टॉर्चर केलं की तिला माझ्याविरोधात बोलायला सांगितलं, ऐकलं नाही म्हणून तिचं पद काढून घेतलं. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत, ते कपटी आहेत, अशा शब्दांत कदम यांनी टीका केली. त्यांनी पुढे म्हटलं की बाळासाहेबांच्या मृतदेहाचा छळ झाला. उद्धव ठाकरेंनी दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या मृतदेहाचा छळ केला. हे मी पुन्हा जबाबदारीने बोलतोय. उद्धव ठाकरे आणि माझी एकदा नार्कोटिक्स चाचणी होऊ दे, दूध का दूध आणि पानी का पानी होईल. मी कधीच खोटं बोललो नाही. मी जेव्हा उद्धव ठाकरेंना सांगितलं की पायांचे ठसे घेऊन ठेवा, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की हातांचे ठसे घेऊन ठेवले आहेत. मग माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते सांगा. हिंमत असेल तर थेट मला सामोरं या, मी उत्तर देईन.

कदम पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे तुम्ही हे पाप केलं आहे. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत, पण मी त्या बोलणार नाही. वेळ पडली तर सोडणार नाही. बाळासाहेब ठाकरे तुमच्याबद्दल माझ्याकडे काय काय बोलले ते माझ्याजवळ आहे. मला ते बोलायला लावू नका. त्यामुळे काल मी अनावधानाने बोललो ती चूक नाही, ते वास्तव आहे. ते घडलं आहे. दरम्यान, त्यांनी गंभीर इशारा देत म्हटलं की उद्धव ठाकरेंनी मला सांगावं ‘रामदासभाई बोला’, मी नक्की बोलेन. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. मी जेव्हा जेव्हा तोंड उघडेन तेव्हा मातोश्रीला हादरे बसतील. माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेनाप्रमुखांसोबत निष्ठेनं दिवस घालवलेत. हजारो वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटली आहे. मीडियानं त्या डॉक्टरांना विचारावं, ते सांगतील आणि सगळा विषय संपेल, असं रामदास कदम पत्रकार परिषदेत म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button