स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना उद्योजक बनवणार
मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

* सर्वच आयटीआयचे नवीनकरण करणार
छत्रपती संभाजीनगर/26 सप्टेंबर : राज्यातील आयटीआयमध्ये नवीन रोजगारभिमुख कोर्स सुरू करण्यात आले असून, राज्यातील सर्वच आयटीआीचे नुतनीकरण करून तेथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअपच्या माध्यमांतून शहरी, ग्रामीण भागांतील तरुणांना उद्योजक घडवण्याची ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी (दि.26) पत्रकार परिषदेत दिली. लोढा यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या आयटीआय संस्थांना भेटी देऊन विविध व्यावसायिक आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कौशल्य विभागाच्या विविध उपक्रमांची रूपरेखा स्पष्ट केली. कौशल्य विभागाने नुकतेच इनोव्हेटीव महाराष्ट्र राज्य स्टार्टअप्स 2025 हे धोरण आणले आहे. या धोरणाच्या अनुषंगाने स्टार्टअप मधील ग्रामीण टक्का वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शासनाकडे नोंद असलेल्या 30 लाख तंत्रशिक्षित युवक-युवतींना ईमेलद्वारे एआय परीक्षेत सहभागी करून प्रथम पाच लाख उमेदवारांची निवड तर पुढील चाळणीनंतर अंतिम टप्प्यात 25 हजार निवडक उमेदवारांना स्टार्टअपच्या माध्यमांतून उद्योजक तयार करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यात तालुका निहाय कोटा निर्धारित करण्यात आला आहे. या उद्योजकांच्या कर्जाच्या 50 टक्के व्याजाचा भार सरकार उचलणार असल्याचीही माहिती यावेळी दिली. 75 हजार तरुणांना रोजगार-राज्यातील 419 शासकीय आयटीआयमध्ये 100 हून अधिक विषयांवरील रोजगाराभिमुख अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विशेष अभ्यासक्रमाद्वारे महिला उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर देण्यात येईल. उद्योग व सेवा क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) केले जाते. या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वर्गखोल्या, यंत्रसामग्री, प्रशिक्षक इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत.




