महापालिका साध्य करणार ‘शून्य कचरा’ चे उद्दिष्ट

नियोजनासाठी आयुक्त सौम्या शर्मांचे निर्देश

-झोन निहाय कचरा संकलन केंद्र सुरु करणार
-शहर स्वच्छतेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही
अमरावती /25 जून: अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी आज, 25 जून रोजी सकाळी कचरा संकलन केंद्र फ्रेजरपुरा, सुकळी कंपोस्ट डेपो आणि गुलिस्तान नगर परिसराची पाहणी केली. ‘शून्य कचरा’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झोननिहाय कचरा संकलन केंद्र सुरू करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश आयुक्तांनी मनपा प्रशासनाला दिले. स्वच्छ अमरावतीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन करतानाच त्यांनी समन्वयातून कार्य करण्याची सूचनाही अधिकार्‍यांना दिली.
फ्रेजरपुरा परिसरातील कचरा तातडीने कमी करण्याचे आदेश देतांना त्यांनी सांगितले की, नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. रस्त्यावरील कचरा त्वरित हटवावा आणि कंटेनरमधून कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी. प्लास्टिक गोळा करून रस्त्याच्या दोन्ही बाजू स्वच्छ ठेवाव्यात. तसेच घनकचर्‍याचे वर्गीकरण नागरिकांकडून कचरा तयार होताना व्हावे, यावर भर देतांना आयुक्तांनी नमूद केले की, ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात टाकणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रकल्पस्थळी वर्गीकरणासाठी स्वच्छता कर्मचार्‍यांवर ताण येऊ नये, यासाठी प्रत्येकाने घरातच योग्य पद्धतीने कचरा टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रकल्पस्थळी वापरल्या जाणार्‍या बायोकल्चर फवारणी, विंड्रो पद्धत आणि तयार होणारे सेंद्रिय खत याचे व्यवस्थित नियोजन करून त्याचा उद्यान व शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करावा, असे आयुक्तांनी सूचित केले. नागरिकांमध्ये एकल वापर प्लास्टिकविरोधात अधिक प्रभावी जनजागृती करावी, असा आदेशही त्यांनी दिला. गुलिस्तान नगर परिसराची पाहणी करतांना सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करून आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगितले की, साफसफाई ही एक सामूहिक जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून आपल्या परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य सुधारते आणि जीवनमान उंचावते.
या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, अभियंता राजेश आगरकर, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक राजेश राठोड, कुंदन हडाले, शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक, कंत्राटदार प्रतिनिधी व इतर मनपा कर्मचारी उपस्थित होते.
-घनकचरा प्रक्रिया प्रकल्प देशात आदर्श ठरावा
दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याचे पुनर्वापर व पुनर्निर्मिती करून शेतकर्‍यांना सेंद्रिय खत उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही यावेळी सौम्या शर्मा यांनी दिल्या. सुकळी कंपोस्ट डेपोच्या कार्यपद्धतीची पाहणी करतांना आयुक्तांनी सांगितले की, येथे कार्यक्षमतेने कचरा प्रक्रिया होऊन नागरिकांना दिलासा मिळावा. अमरावती महानगरपालिकेचा हा शास्त्रोक्त घनकचरा प्रक्रिया प्रकल्प देशात आदर्श ठरावा, यासाठी आवश्यक ते उपाय करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

संबंधित बातम्या

Back to top button