‘जय भीम’च्या घोषणा ही अराजकता आहे का?
अभिजीत दिपकेंचा सीएम फडणवीसांना सवाल

मोदी सरकारवरही साधला निशाणा
संभाजीनगर/7 जून -कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करून छत्रपती संभाजीनगरमधील घरी परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी मोदी सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ’मी ’जय भीम’च्या घोषणा देतो, मुख्यमंत्र्यांना अराजक म्हणायचं आहे का? असा सवाल अभिजीत दिपके यांनी केला. दिल्लीच्या जंतर मंतरवर तरुणांच्या आंदोलनाचं नेतृत्व अभिजीत दीपके यांनी केलं. ते दिल्लीतील आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत्या घरी परतले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना दीपके म्हणाले की, ’मी ’जय भीम’च्या घोषण देतो, त्यास अराजक म्हणायचं आहे का? त्यांनी थोडा विचार करावा. ते यूपीचे मुख्यमंत्री नाहीत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. जो महाराष्ट्र पुरोगामी आहे. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, ते ’जय भीम’च्या घोषणा देतात, ते त्यांना कसं काय अराजक म्हणू शकतात, जे विधान त्यांनी केलं. त्यावर मला लाज वाटली’. परदेशात राहण्यावरून टीका झाली, त्यावर भाष्य करताना दीपके म्हणाले, एका पाकिस्तानीला दिल्लीत प्रदर्शन करू देता हे तुम्हाला म्हणायचं आहे का? वेदांत नावाच्या सीबीएससीच्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्याला सरकारने पाकिस्तानी म्हटलं आहे. त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, हा कारभार त्यांनी उघड केला. तेव्हा त्याला तुम्ही पाकिस्तानी म्हणतात’. ’तुम्ही कोणाला कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहात. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, रोजगार मागणार्यांना पाकिस्तानी म्हणता, मग भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि आयटीसीवाले भारतीय आहेत का? आम्ही पाकिस्तानी हे कुठपर्यंत चालणार आहे, असा सवाल त्यांनी पुढे केला.




