काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांचे तडकफडकी निलंबन

स्वत:हून उमेदवारी मागे घेण्यावरुन कारवाइ

मुंबई/5 जून- राज्यातील विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षशिस्तीचा बडगा उगारला आहे. पक्षादेशाशिवाय उमेदवारी अर्ज मागे घेतल्याप्रकरणी यवतमाळचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात वागणार्‍या नेत्यांना स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न मानला जात आहे. यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडीनंतर दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. एकूण पाच उमेदवारांपैकी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये, साहेबराव कांबळे, नितीन भुतडा, साजिद बेग, सय्यद फारुख यांनी माघार घेतली.
या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. विविध पक्षांतील उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. साहेबराव कांबळे यांनी पुरेसे मतदारसंख्याबळ नसल्याचे कारण देत उमेदवारी मागे घेतली. मात्र त्यांच्या निर्णयावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या माघारीनंतर यवतमाळमधील दत्ता चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनकेले. लोकशाहीची थट्टा झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या घडामोडींमुळे यवतमाळ विधानपरिषद निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली. काँग्रेसच्या निलंबन कारवाईमुळे पक्षशिस्तीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

संबंधित बातम्या

Back to top button