आकांक्षाच्या मृत्युला आमची मुले जबाबदार नाही
आरोपी प्रतिक व प्रथमेशच्या पालकांचा दावा

-पोलिस आयुक्तांची भेट
-सखोल चौकशीची मागणी
अमरावती / 16 जून: गाडगेनगर परिसरात गत 4 जून रोजी घडलेल्या आकांक्षा बोबडे या विद्यार्थीनीच्या संशयास्पद मृत्यु प्रकरणात आमच्या मुलांचा कुठलाही हात नाही. त्यांना विनाकारण जबाबदार धरले जात असल्याचा दावा, याप्रकरणातील आरोपी प्रतिक हिवसे आणि प्रथमेश अढाउ यांच्या पालकांनी केला आहे. आज दोन्ही कुटुंबियांनी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेउन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. आकांक्षा बोबडे हिच्या मृत्यु प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी असलेली आकांक्षा बोबडे ही अमरावतीत भाड्याच्या खोलीत राहत होती. 4 जून रोजी गाडगेनगर परिसरात असलेल्या तिच्या खोलीत तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी संशयाच्या आधारे आकांक्षाचे मित्र प्रतिक शरद हिवसे आणि प्रथमेश हरिदास अढाउ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आपल्या मुलांवरील आरोप दोघांच्याही पालकांनी फेटाळून लावले असून आकांक्षा बोबडेच्या मृत्युला आमची मुले जबाबदार नसल्याचा त्यांचा दावा आहे. आज पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आरोपी प्रतिकचे वडिल शरद हिवसे आणि प्रथमेशची आई ज्योती अढाउ यांनी पत्रकार परिषद घेउन मुलांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी सांगितले की, आकांक्षाचा मृत्यु 8 वाजण्याच्या पूर्वीच झाला होता. प्रतिकला तेथे कॉल करुन बोलाविण्यात आले होते. प्रतिक तेथे पोहोचला तेव्हा त्याला खोलीत आकांक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्याचवेळी प्रथमेश तेथे आला. त्यांनी 8.25 वाजता 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिकेला पाचारण केले. तोपर्यंत अन्य काही मित्रही तेथे मदतीसाठी पोहोचले होते. यातून प्रतिक आणि प्रथमेशने केवळ आकांक्षाचे प्राण वाचावे या उद्देशाने सर्व हालचाली केल्याचे स्पष्ट होते, असे शरद हिवसे आणि ज्योती अढाउ यांचे म्हणणे आहे.
घटना घडली तेव्हा आकांक्षा बोबडेची मोठी बहिण घटनास्थळी आली होती. ती काही वेळ तेथे थांबली. तिने घटनास्थळी काही फोटो काढले आणि कोणतीही वाच्यता किंवा कुणाशीही चर्चा न करता ती तेथून निघून गेली. आकांक्षाच्या मोठ्या बहिणीने कोणतही मदत केली नाही किंवा पोलिसांना सूचना देण्यासाठीही तिने कोणतीच हालचाल केली नाही. तिचे वागणे संशयास्पद असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आमची मुले निर्दोश आहेत. त्यांना याप्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी सखोल व निष्पक्ष चोकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.