बारावीच्या परीक्षार्थीवर सीसीटीव्हीची नजर

जिल्हाधिकार्‍यांचे विशेष पथक, कॉपी बहादरांचे धाबे दणाणले, अमरावतीच्या 137 केंद्रांवर 35 हजार विद्यार्थ्यांची धावपळ

अमरावती / 9 फेब्रुवारी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचा आज, 10 फेब्रुवारीपासून जिल्हाभरात श्रीगणेशा होत आहे. अमरावती जिल्ह्यातील 137 केंद्रांवरून 35 हजार 929 विद्यार्थी आपल्या भविष्याची परीक्षा देणार आहेत. यंदाची विशेष बाब म्हणजे, जिल्हाधिकारी आशीष येरेकर यांनी ’कॉफीमुक्त’ अभियानाचा विडा उचलला असून, इतिहासात पहिल्यांदाच 100 हून अधिक केंद्रांवर थेट सीसीटीव्हीचा कडक वॉच राहणार आहे. केंद्राच्या परिसरात पोलिसांनी आपली फौज तैनात केली असून, आज परीक्षा केंद्रावर केवळ विद्यार्थ्यांचीच वर्दळ दिसेल; इतर लोकांना केंद्राच्या आसपासही फिरकण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे. परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रशासनाने सर्व केंद्रांवर आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जिल्ह्यातील 43 केंद्रांना ’अतिसंवेदनशील’ म्हणून घोषित करण्यात आले असून, तिथे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष व्यूहरचना आखली आहे. ज्या केंद्रांवर कॅमेरे बसवणे शक्य झाले नाही, तिथे संशय नको म्हणून चक्क केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षकांचीच अदलाबदल करण्यात आली आहे. अमरावती विभागाचा विचार केला तर पाचही जिल्ह्यांतून एकूण 1 लाख 57 हजार 267 विद्यार्थी नशीब आजमावणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः मैदानात उतरून तयारीचा आढावा घेतल्याने यंदा कॉफी बहादरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. काल संध्याकाळपर्यंत सर्व केंद्रांवर बाके, पाणी आणि बैठक व्यवस्थेचे काम पूर्ण करून शिक्षण विभागाने आपला अहवाल सादर केला आहे. आता केवळ विद्यार्थ्यांच्या लेखणीचा कस आजपासून लागणार आहे.
विभागातील परीक्षेचे मैदान
जिल्हा              परीक्षार्थींची फौज            परीक्षा केंद्रे
अमरावती             35,929                      137
बुलढाणा               36,364                      117
यवतमाळ              35,570                     128
अकोला                 27,035                      87
वाशिम                  22,369                      74
मेळघाटात मेडिकल कॉलेजसाठी हालचाली सुरु
परिसराचा कायापालट होईल.

संबंधित बातम्या

Back to top button