युवा स्वाभिमान पार्टीकडुन 10 हजार हौद जलकुंडाची व्यवस्था
वन्यजीव प्राण्यांसाठी पाण्याचे टाके केली तयार

अमरावती/15 एप्रिल- अमरावती जिल्हयात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्षी, जनावरे व वन्यजीवांना पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रवि राणा यांच्या निर्देशानुसार संपूर्ण अमरावती जिल्हयात शहर व ग्रामीण तसेच मेळघाट येथे युवा स्वाभिमान पार्टीतर्फे एक अभिनव व समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागात,छत्री तलाव व अमरावती जिल्हा शहर व ग्रामीण तसेच मेळघाट परिसरात एकूण सुमारे 10 हजार जलकुंड (पाण्याचे टाके) उभारण्याची योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून पक्षी, गोमाता, पाळीव प्राणी तसेच विविध हरीण, कावीळ व इतर वन्यजीवांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
युवा स्वाभिमान पार्टीच्या सर्व नगरसेवकांकडून त्यांच्या-त्यांच्या प्रभागात जागोजागी हौद जलकुंड ठेवण्याचे काम सुरू झाले असून, काही ठिकाणी बर्ड फिडरही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना अन्न व पाणी दोन्ही मिळणार असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.या उपक्रमामुळे जिल्हयात नागरिकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत असून, समाजातील इतर घटकांनीही अशा प्रकारच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या या अभिनव पुढाकारामुळे केवळ प्राणीमात्रांची तहान भागविण्याचे काम होत नसून, पर्यावरणाबाबत जनजागृतीही निर्माण होत आहे. उन्हाळ्यातील कठीण परिस्थितीत हा उपक्रम नक्कीच दिलासादायक ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.




