महावितरणकडून ‘इकॅमेक्स-2026’ मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर
केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांनी केले कौतुक

अमरावती/ 7 एप्रिल : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (इकॅम) वतीने गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘इकॅमेक्स-2026’ या तीन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महावितरणच्या प्रदर्शनीला केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांनी भेट शनिवारी (दि. 4) भेट दिली व विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. गोरेगाव येथे ‘इकॅमेक्स-2026’चे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. श्रीपाद नाईक यांच्याहस्ते झाले.
विद्युत कंत्राटदारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्युत क्षेत्राच्या माध्यमातून प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन नाईक यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात ऊर्जा क्षेत्रात राज्याने देशात मोठी आघाडी घेतली आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी शाश्वत व स्वस्त विजेसाठी ऊर्जा परिवर्तनाचा ’रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठी गती दिली आहे. सौर ऊर्जेच्या योजनांद्वारे सद्यस्थितीत 20 लाख 66 हजार शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे. तर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेमधून आतापर्यंत 5 लाखांवर घरगुती ग्राहकांनी लाभ घेतल्याचे पवार यांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री नाईक यांनी प्रदर्शनीतील महावितरणच्या दालनाला भेट दिली आणि विविध योजना, उपक्रमांची माहिती घेत कौतुक केले. त्यांचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी स्वागत केले व माहिती दिली. यावेळी विशेष कार्य अधिकारी सुधन्वा पत्की (नवी दिल्ली), इकॅमचे अध्यक्ष देवांग ठाकूर, सरचिटणीस अमरनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. या तीन दिवसीय प्रदर्शनीत महावितरणचे मुख्य अभियंता पंकज तगलपल्लेवार आणि विद्युत सुरक्षा मोहिमेचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी विशेष सत्रात विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन केले. महावितरणच्या अभियानामध्ये सहभागी होत ग्राहक संवादाद्वारे विद्युत सुरक्षेचा जागर करण्याची ग्वाही यावेळी इकॅमच्या वतीने देण्यात आली.




