कामुंजा येथे विधी सेवा व कायदेविषयक जागरूकता शिबीर
डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

अमरावती /1 मार्च : श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती व तहसील कार्यालय, अमरावती (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विधी सेवा व कायदेविषयक जागरूकता शिबिर 2026’ अंतर्गत मौजा-कामुंजा येथे दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी व्यापक जनसहभागात शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अनिलजी भटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा एन. देशमुख उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती चे सचिव एस. वामने, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय लोखंडे, तसेच पोलीस निरीक्षक वैभव पानसरे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कामुंजा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व मनमोहक नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.शिबिरामध्ये नागरिकांना मोफत विधी सहाय्य, महिलांचे व बालकांचे हक्क, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार, शासनाच्या विविध योजना तसेच कायदेविषयक तरतुदींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात प्रभावी पथनाट्य सादर करून तसेच घरोघरी जाऊन जनजागृती केली. उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या कायदेशीर अडचणी मांडून तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घेतले.उपविभागीय अधिकारी अनिलजी भटकर यांनी शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांची माहिती देत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. वर्षा एन. देशमुख यांनी कामुंजा गाव एक वर्षासाठी कायदेविषयक सहाय्यासाठी दत्तक घेत असल्याची घोषणा केली. गावकर्यांच्या कोणत्याही कायदेशीर समस्येचे निराकरण करण्यासाठी महाविद्यालय तत्पर राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमास नायब तहसीलदार श्रीकृष्ण गाडेकर,राजेश धावणे, सुनील रासेकर, कृष्णा काळे, सरपंच सौ. निशाताई राऊत, . यादव सर ,सौ. प्राजक्ता तायडे , सौ. वर्षाताई सुनील वार्हाडे,सौ. मीना ताई मालवे ,. नितीन वैद्य, मंगेश वार्हाडे,सौ. भारती दमधरे ,अजित पाटील ,. जयकुमार कंदेलकर,सुनील भगत,अतुल काळे. आवारे ,सौ. प्रगती वार्हाडे , गजानन वार्हाडे, सौ. राधाताई काळे ,सौ. मंदाताई राठोड, सौ. मालाताई बेलसरे सौ. रोहिणीताई धोते , शेख सलाम तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. कीर्तीराज सावळे, प्रा. संदीप वानखडे, प्रा. अन्यक्ती कीर्तीकर, प्रा. उज्वल मानकर तसेच आयोजन समितीतील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. एलएलबी तीन वर्षीय द्वितीय वर्ष व बी.ए. एलएलबी पाच वर्षीय चौथ्या वर्षातील एकूण 390 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.




