शहरवासियांना आता मिळणार शुद्ध अन्नाची खात्री
आरोग्यासाठी प्रयोगशाळेतील तपासणी ठरतेय वरदान, अन्न व जलशुद्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

अमरावती/23 जून– आजच्या धावपळीच्या काळात आपण जे अन्न खातो किंवा पाणी पितो, ते शरीरासाठी खरोखर सुरक्षित आहे का, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. ग्राहकांचे आरोग्य जपणे आणि पदार्थांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आता अमरावतीमधील ‘युबिक्स टेस्टिंग लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ने पुढाकार घेतला आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून नागरिकांना आता आपल्या आहाराची गुणवत्ता आणि शुद्धता तपासण्याची आधुनिक सोय उपलब्ध झाली असून, यामुळे भेसळमुक्त अन्नाचे महत्त्व वाढले आहे.
अन्न आणि पेयांची गुणवत्ता तपासणे ही काळाची गरज झाली आहे. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकाने आपल्या उत्पादनांची वेळोवेळी प्रयोगशाळेत तपासणी करणे अनिवार्य आहे. यामुळे ग्राहकांचा ब्रँडवरील विश्वास वाढतो आणि व्यवसायाची प्रतिष्ठा उंचावते. या प्रयोगशाळेत दूध, पनीर, तूप, लोणी, दही, बेकरी उत्पादने, बिस्किटे, नमकीन, मसाले, डाळी, खाद्यतेल, शीतपेये आणि पॅकेज्ड फूडची कसून तपासणी केली जाते. विशेष म्हणजे, बाजारात मिळणार्या अन्नावर आता पोषणमूल्यांची माहिती असणे गरजेचे आहे, त्यासाठी लागणारी शास्त्रीय चाचणी येथे केली जाते. केवळ अन्नच नव्हे, तर पिण्याचे पाणी, बोअरवेलचे पाणी, औद्योगिक पाणी आणि बांधकामात वापरल्या जाणार्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय निकषांचा वापर केला जातो. या प्रयोगशाळेत अन्न आणि जलतपासणी व्यतिरिक्त बांधकाम साहित्य तपासणी, वायू गुणवत्ता, पर्यावरण देखरेख, कोळसा तपासणी, माती परीक्षण आणि स्ट्रक्चरल ऑडिटसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात. युबॅक्स टेस्टिंग लॅबोरेटरीचे संचालक उज्ज्वल बंगे आणि अजिता बंगे यांनी या सुविधेमुळे अमरावतीसह परिसरातील उद्योजकांना आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. या वेळी ग्लेशियर फार्मा, रघुवीर मिठाई, खरोडे गृहउद्योग, शिवशक्ती आईस्क्रीम आणि पगारिया फूड लॅब्स, नागपूर यांसारख्या प्रमुख ग्राहकांची उपस्थिती होती. व्यवसायाचे नियम पाळण्यासाठी आणि लोकांच्या आरोग्याची सुरक्षा करण्यासाठी नियमित तपासणी करणे हाच आता एकमेव प्रभावी पर्याय ठरत आहे.




