अमरावतीच्या कैद्याची अकोला कारागृहात आत्महत्या
कारागृहाच्या परिसरात विहिरीत उडी घेतल्याने खळबळ

मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मृतकाच्या नातेवाईकांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
अकोला /23 जुलै- अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, पत्नीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एका कैद्याने कारागृहाच्या आवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील हिंगणी गावंडगाव येथील रहिवासी अनिल ओंकार निंबोकार (वय 35) असे मृत कैद्याचे नाव आहे. या गंभीर घटनेमुळे कारागृह प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून, अत्यंत कडक पहारा असताना कैदी थेट विहिरीपर्यंत पोहोचला कसा आणि सुरक्षा रक्षक (बाबा) कुठे झोपले होते, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. अवघ्या चार महिन्यांत आई आणि वडिलांचे छत्र हरपल्याने निंबोकार दांपत्याची दोन लहान मुले पूर्णपणे उघड्यावर पडली आहेत.
कौटुंबिक वाद आणि चारित्र्यावरील संशयातून चार महिन्यांपूर्वी अमरावतीच्या अनिल याने त्याची पत्नी वृषाली हिची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली होती आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी अकोला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना अनिलने अचानक कारागृहाच्या आवारात असलेल्या विहिरीत उडी घेतली. ही बाब लक्षात येताच प्रशासनाची मोठी पळापळ झाली. कर्मचार्यांनी त्याला तातडीने विहिरीबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अनिल आणि वृषाली यांचा 13 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. कौटुंबिक कलहामुळे हे हसतेखेळते कुटुंब पार उद्ध्वस्त झाले आहे. चार महिन्यांपूर्वी आईचा मृत्यू झाला आणि आता वडिलांनीही कारागृहात आत्महत्या केल्याने या निष्पाप दोन लहान मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे सावट कायमचे निघून गेले आहे. कारागृह कर्मचार्यांच्या निष्काळजी पणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा थेट आरोप मृत कैद्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी अमरावती येथील नातेवाईकांनी लावून धरली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून, कर्तव्यात कसुरी करणार्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी केली जात आहे.
आई – वडिलांचे छत्र हरपल्याने दोन लहान मुले उघड्यावर-अकोला कारागृहातील या दुर्देवी घटनेमुळे 13 वर्षांचा संसार पार उधळला गेला आहे. चार महिन्यांपूर्वी आई वृषाली हिची हत्येत ताटातूट झाली, तर आता अमरावतीच्या अनिल निंबोकार यांनी विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या प्रकारामुळे त्यांची दोन लहान मुले अचानक पगारी झाली असून, कारागृहाच्या ढिसाळ कारभारामुळे या निष्पाप बालकांचे छत्र पूर्णपणे हरपले आहे.




