भाषेचा गोडवा टिकवायला हवा

मराठी ही ज्ञानभाषा म्हणून पुढे यायला हवी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई/27 फेब्रुवारी – कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन विधान भवनात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे आयोजित जावे विनोदाच्या गावाया विशेष कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदी साहित्याचे अभिवाचन, संवाद आणि सांस्कृतिक सादरीकरण झाले. याचवेळी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित लोकसेवेचा लोकजागर या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून पुढे यायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रमाण भाषेचे महत्त्व शिकवले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात दर्जा देऊन राजाश्रय दिला. भाषेचा गोडवा टिकवायला हवा आणि तिचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायला हवे. लोककला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी जिवंत ठेवायला हवी.
माय मराठीचे वैभव वाढवण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मराठीला हजारो वर्षांची परंपरा आहे. आचार्य अत्रे आणि पू. ल. देशपांडे हे विनोदाचे दोन शिखर आहेत. खान्देशी, कोंकणी, अहिरणी या सर्व मराठीच्या बहिणी आहेत. अभिजात दर्जा टिकवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तंत्रज्ञानाच्या काळातही माय मराठीचे वैभव वाढवण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला.

मराठीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन

याच विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी देखील व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, मंत्री उदय सामंत यांसह राज्यातील अनेक खासदारांनी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. याबद्दल डॉ. गोर्‍हे यांनी आभार मानले व मराठीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या

Back to top button