शेतकर्‍यांना जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी

आयकरदात्या शेतकर्‍यांना योजनेतून

वगळणार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी

वालचंदनगर /12 जुलै  : राज्यातील शेतकर्‍यांना जुलै महिना संपण्यापूर्वीच कर्जमाफी देण्यास सरकार कटिबद्ध असून, करदात्या (आयकर भरणार्‍या) शेतकर्‍यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. रविवार, दिनांक 12 रोजी कृषीमंत्री भरणे हे आपल्या निवासस्थानी आले असता पत्रकारांनी त्यांना कर्जमाफीबाबत प्रश्न विचारले. यावेळी कर्जमाफीसाठी सरकारकडून ’तारीख पे तारीख’ दिली जात असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, हे सरकार शेतकरी हिताचा विचार करणारे आहे. वास्तविक पाहता आम्ही कर्जमाफीसाठी 5 जुलै ही तारीख दिली होती.
पावसाळी अधिवेशनात 20 हजार कोटींचे पुरवणी बजेट मांडून त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करून योजना अधिक स्पष्ट केली.
त्यानुसार, सन 2019 च्या कर्जमाफीतील शेतकर्‍यांनाही सरसकट 2 लाखांची कर्जमाफी  दिली जाणार असून, नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, यामध्ये करदात्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी करदात्या शेतकर्‍यांची माहिती केंद्र सरकारकडून मागवण्यात आली असून, त्या
प्रस्तावावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्वाक्षरी झाली आहे तो प्रस्ताव आता राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी गेला असून, लवकरच मंजुरी मिळून प्रत्यक्षात कर्जमाफीच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.जरी कर्जमाफी देण्यास थोडासा उशीर झाला असला, तरी या बदलांमुळे कर्जमाफीची रक्कम 36 हजार 585 कोटींवरून थेट 40 हजार कोटींवर जाणार आहे. शिवाय, योजनेच्या अंमलबजावणीपूर्वीच लाभार्थ्यांची अचूक पडताळणी झाल्याने नंतर कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, असे सांगत कर्जमाफीची प्रक्रिया जुलै महिन्याच्या पुढे जाणार नाही, असा ठाम विेशास कृषीमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

Back to top button