अन्यथा संपूर्ण निवडणुका ’स्थगित’ कराव्या लागल्या असत्या
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

मुंबई /2 डिसेंबर : राज्यातील 20 पेक्षा जास्त नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या असून शेकडो प्रभागातील नगरसेवकपदाच्याही निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे, बहुतांश कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची, उमेदवारांची घोर निराशा झाली आहे. त्यानंतर, आता राज्य निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व बाजूंचा विचार करुन आणि कायदेशीर सल्ला घेऊनच काही निवडणुका पुढे ढकलल्या, असे राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यातील एकूण 24 नगरपालिका आणि दीडशे सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत. मात्र, या निर्णयाचा सध्याच्या निवडणुकांवर परिणाम उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं होतं. अन्यथा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या, त्यामुळे ठराविक निवडणुका पुढे ढकल्याची माहिती आयोगामधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्यांना पुरेसा वेळ नियम ’क’ आणि ’ड’ प्रमाणे देण्यात आला आहे आणि त्यानुसार पुढे ढकललेल्या निवडणुका 20 डिसेंबर रोजी घेण्यात येत आहेत. राज्यातील 24 नगरपालिका मधील नगराध्यक्ष आणि 150 च्या जवळपास सदस्यांच्या प्रचार खर्चाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने विचाराधीन ठेवला असून याबद्दल लवकरच निर्णय जाहीर केला जाईल.




