शेतकरी कन्या रूपाली ठाकरे यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान

टाकरखेडा संभू/1 जून : दिनांक 25 मे 2025 भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे आयोजित कृषी रत्न सन्मान सोहळ्यात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आणि शेतकरी कन्या असलेल्या रूपाली ठाकरे यांना कृषी मित्र अधिकारी या संवर्गातून राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रूपाली ठाकरे या कृषी विभागात कार्यरत असून, शेतकर्यांशी थेट बांधावर जाऊन संवाद साधत त्यांच्या शेतीविषयक समस्यांना मार्गदर्शन व मदतीचा हात देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश साबळे, भातकुली तालुका कृषी अधिकारी सौ. उत्कर्षा भोसले, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेती सौ. पौर्णिमा सवाई, आयडियल ऍग्रो सर्चचे श्री. वैभव जाधव, संत गाडगेबाबा अध्यासनचे डॉ. दिलीप काळे, बँक संचालक भैय्यासाहेब निचळ, माजी सरपंच दीपक पाटील, सरपंच सौ. रश्मी देशमुख व उपसरपंच प्रदीप शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश साबळे यांनी यावेळी सांगितले की, शेतकर्यांशी प्रत्यक्ष बांधावर जाऊन प्रामाणिकपणे संवाद साधणारे कृषी अधिकारीच खरी आर्थिक प्रगती घडवू शकतात. रूपाली ठाकरे यांचे कृषी क्षेत्रातील योगदान व निष्ठा यांना मान्यता म्हणून मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संपूर्ण शेतकरी समाजाकडून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.