सावंगा आसरात युवा शेतकर्‍याची आत्महत्या

आर्थिक तंगीपाई उचलले टोकाचे पाउल

अमरावती / 30 मे : आर्थिक तंगीला कंटाळून एका 29 वर्षीय युवा शेतकर्‍याने आधी विषारी द्रव्य प्राशन करुन व नंतर गळफास घेउन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या सावंगा आसरा या गावात गुरुवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. धनंजय दिलीप राउत असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार राउत कुटुंबाकडे सावंगा आसरा शिवारात तीन एकर शेती असून ही शेतीच या कुटुंबाच्या चरितार्थाचे साधन आहे. धनंजय स्वत:च शेती करुन आपले कुटुंब चालवत होता. धनंजयवर स्टेट बँकेेचे कर्ज होते. पिकांचे नूकसान झाल्याने कर्ज फेडणे त्याला शक्य होत नव्हते. अशातच आगामी खरिप हंगामाकरिता शेतीची मशागत, बिबियाणे व खतांची खरेदी यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. पैशांची जुळवाजुळव करणे शक्य न झाल्याने तो काही दिवसांपासून हताश झाला होता. त्यातच त्याने हे आत्मघाती पाउल उचलले असावे, असे गावातील काही लोकांनी सांगितले.
शुक्रवारी रात्री निराशावस्थेत असताना धनंजय राउत याने आधी घरात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर गळफास लावून घेतला व आपली जीवनयात्रा संपविली. रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी सावंगा आसरा येथे जावून घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. मृतक धनंजय याच्या पश्चात आई-वडिल आणि एक बहिण आहे. आर्थिक तंगीमुळे कुटुंबाचा आधार असलेल्या एका युवा शेतकर्‍याच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button