नवीन जीआरमुळे 50 लाख मराठा ओबीसीमध्ये ?
आमच्या तोंडातला घास हिरावून नेतील

* सरकारला झुकावच लागेल, वडेट्टीवारांचा इशारा
नागपूर/21 सप्टेंबर – कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी हा ओबीसींच्या भरवश्यावर निवडून येतो. तुमच्याच भरवश्यावर मस्ती करतो असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ओबीसींना बांधवांनी त्यांना वठणीवर आणण्याचं केलं पाहिजे असेही ते म्हणाले. वेळ आल्यास बदडून काढायला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या नवीन जीआरमुळे 50 लाख मराठा हे ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतील. ओबीसी समाज पहिलाच उपाशी आहे, त्यात एवढे लोक आले तर आमच्या तोंडातला घास हिरावून नेतील असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. आपलं आरक्षण कोणी हिरावून घेऊ नये याची सुरुवात आपण गोंदियापासून केली आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. 2 सप्टेंबरच्या जीआरमध्ये पात्र शब्द हटवल्यामुळे सरसकट हैदराबाद गॅजेटनुसार संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये येतो. शिंदे समिती सरकारने नेमली आहे. शिंदे समिती निकाल मराठ्यांच्या बाजूने देणार की ओबीसींच्या बाजूने देणार हे पाहावं लागेल, असे वडेट्टीवार म्हणाले. दोन सप्टेंबरच्या जीआरच्या त्रुटीचे वाचन वडेट्टीवार यांनी केले. नांदेडमध्ये मोठ्या नेत्याने फोन करून लगेच जातीचा दाखला दिला याचा पुरावा असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या या जीआरमुळे 50 लाख मराठा हे कुणबी प्रमाण ओबीसी समाजामध्ये समाविष्ट होतील.




