बियाणे आणि खतांमध्ये 250 रुपयांपर्यंत दरवाढ

खरीप पेरणीचे बजेट कोलमडणार

-शेतकर्‍यांना बसणार आर्थिक फटका
अमरावती / 28 मे: निसर्गाच्या लहरीपणामध्ये आर्थिक गणित कोलमडलेल्या शेतकर्‍याला यंदाच्या खरीप हंगामात महागाईची झळ सहन करावी लागणार आहे. कारण ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांना पेरणीसाठी लागणार्‍या बियाणे आणि मिश्र खतांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 60 ते 250 रुपयांची दरवाढ झाली असल्याने शेतकर्‍यांना या महागाईचा फटका बसणार आहे.
शेतकरी उत्पादन घेण्यासाठी पैशाची तजबीज करत असतो. पेरणी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतो. तसेच हात उसनवारीने पैसे घेत हंगामाला सुरवात करत असतो. अगदी बियाणे खरेदीपासून पिकांची उगवण झाल्यानंतर त्यांना खत व फवारणी करत पिकांना वाढवत असतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणा मध्ये मोठे नुकसान होते. शिवाय आलेल्या मालाला अपेक्षित भाव देखील मिळत नसल्याने बहुतेक वेळेस केलेला खर्च देखील निघत नाही. यामुळे आर्थिक गणित कोलमडत असते. अशात आता बियाणे आणि खतांची भाववाढ झाली आहे.
खरीप हंगामात प्रामुख्याने मका, सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, बाजरी व मूग या पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणे बाजारपेठेत उपलब्ध झाले असून काही कंपन्यांचे मका बियाणे हे 100 ते 200 रुपयांनी महागले आहे. मकाचे 4 किलो बियाणे पाकीट 800 ते 2250 रुपयांपर्यंत आहेत. तर कपाशीचे बियाणे पाकीट 40 रुपयांनी महाग झाले आहे. यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकर्‍याला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत डीएपी खत वगळता अन्य खतांच्या बॅगमध्ये 180 ते 280 रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये 12:32:16 या ग्रेडमध्ये वाढ झाली आहे. 10:26:26, 15:15:15 आणि 20:20:0:13 या खतांच्या किमती वाढल्या आहे. यामुळे खरिप पेरणीचे बजेट वाढणार आहे. याशिवाय रोगराई दूर करण्यासाठी लागणार्‍या औषधीचे दर देखील वाढले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button