बडनेरा-नरखेड मार्गावर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

मेमू ट्रेनच्या वेळा बदलल्या

-सेवा सुसंगत होण्याचा दावा
अमरावती / 28 मे: प्रवाशांना सोयीचे व्हावे आणि मेमू ट्रेनचे संचालन अधिक कार्यक्षम व्हावे, या हेतूने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने बडनेरा-नरखेड मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलविण्याचा निर्णय घेतला आहे. नवे वेळापत्रक 5 जूनपासून लागू केले जाणार आहे. मध्य रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार गाडी क्रमांक 61103 बडनेरा-नरखेड मेमू ही गाडी बडनेरा येथून आता रोज दुपारी 1:05 वाजता सुटेल आणि नरखेडला सायंकाळी 4 वाजता पोहोचेल.
त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 61104 नरखेड बडनेरा मेमू रोज नरखेड येथून सायंकाळी 5:10 वाजता सुटेल आणि बडनेरा येथे रात्री 8:35 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 61105 बडनेरा नरखेड मेमू दररोज सकाळी 6:40 वाजता बडनेरा स्थानकातून प्रस्थान करेल आणि सकाळी 9:30 वाजता नरखेड स्थानकात पोहोचेल. गाडी क्रमांक 61106 नरखेड-बडनेरा मेमू दररोज सकाळी 10:10 वाजता नरखेड येथून सुटेल आणि दुपारी 1:40 वाजता बडनेरा येथे पोहोचेल.
नव्या निर्णयानुसार, गाडी क्रमांक 261123 आमला-छिंदवाडा मेमू ट्रेन आता रोज सकाळी 8:20 ला सुटणार असून, छिंदवाडा येथे 11:30 वाजता पोहोचेल. आधी या गाडीची आमला येथून सुटण्याची वेळ सकाळी 8 वाजताची होती. मेमू गाड्यांच्या नेहमी उशिरा पोहचत असल्याने प्रवाशांची नेहमीच ओरड ऐकायला मिळते. या सुधारित वेळापत्रकामुळे नागपूर-आमला-छिंदवाडा व बडनेरा-नरखेड मार्गावरील मेमू सेवा अधिक सुसंगत आणि प्रभावी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
नरखेड रेल्वे मार्ग बर्‍याच वर्षांच्याा प्रतीक्षेनंतर पूर्ण झाला. पण, अजूनही या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढलेली नाही. या मार्गावरून हैद्राबाद, अजमेर, वैष्णोदेवी, दिल्ली येथे जाण्यासाठी एक्सप्रेस गाड्या या मार्गाने सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

-नरखेड-बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाची मागणी
नरखेड-बडनेरा-वाशीम रेल्वेमार्गाच्या निर्मितीची मागणी गेल्या दशकापासून होत आहे. बडनेरा-वाशीम या रेल्वे मार्गामुळे दिल्लीवरून बेंगळुरुला जाण्यासाठी सध्या नवी दिल्ली, इटारसी, खंडवा, भुसावळ, दौंड, मीरज, वेल्लोर, बंगळुरू असा एक मार्ग आहे. तर नवी दिल्ली, इटारसी, आमला, नागपूर, बल्लारशा, विजयवाडा, तिरुपती, बेंगळुरु हा दुसरा मार्ग आहे. या दोन्ही मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून नवी दिल्ली, इटारसी, नरखेड, बडनेरा, वाशीम, हिंगोली, लातूर, वाडी, गुंटूर, बेंगळुरू हा तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे दिल्ली-बेंगळुरू हे अंतर 635 किलोमीटरने कमी होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button