मुंडे ‘इन’ तर कोकाटे ‘आऊट’?

निर्णय फडणवीस घेणार, दादांनी चेंडू टोलवला

मुंबई / 27 जुलै : धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक विधान करत निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलावला. तसेच वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वरील कारवायाच्या निर्णयाबाबतही मुख्यमंत्री फडणवीसच निर्णय घेतील, असे सांगून कोकाटेंवर कारवाई होणार की, अभय मिळणार याची उत्सुकता देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहिल्यानगर जिल्हा दौर्‍यावर आहेत. राहुरी येथे अरुण तरपुरे यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ते मेळाव्यानंतर अहिल्यानगर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणासाठी आणि क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले पुतळा उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते. धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा भाजप महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होण्याच्या चर्चांचा जोर आहे. त्यावर अजित पवार म्हणाले, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतात. मी याबाबत एवढेच बोललो आहे की, त्यांच्या संदर्भात न्यायालयीन व राज्य सरकार मार्फत चौकशी जी सुरू होती, त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. मंत्रिमंडळात कोण असावे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री व महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र बसून घेऊ.
वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नावर देखील अजित पवार यांनी निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सांगितले. कारवाई करण्याचा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मंत्रिमंडळात कोण असावे कोण नसावे हे त्यांना अधिकार भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. सरकारी विश्रामगृहावर अजितदादा आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी बुके आणले होते. हे स्वीकारात असताना त्यांच्या बोटाला लागलं. अजितदादांच्या बोटातून थोडाफार रक्त देखील आलं. तरीदेखील अजितदादांनी कार्यकर्त्यांची नाराजी नको म्हणून सत्कार स्वीकारत राहिले.

संबंधित बातम्या

Back to top button