गौरखेडा कुंभी आश्रमशाळेतील 2 मुली रात्री 2 वाजता बिहालीच्या जंगलात
किर्रर अंधारात जंगलातून दोन मुली जातांना बघून भीलट बाबाच्या अंगाचे झाले पाणी पाणी

हिंस्त्र श्वापदांनी कोणत्याही क्षणी त्या निरागस बालिकांवर झडप घातली असती
रात्रीच्या अंधारात आश्रमशाळेतून मुली बाहेर पडल्याच कश्या?
मुख्याध्यापक अधिक्षकांना निलंबित करण्याची पालकांची मागणी
शिक्षण व प्रकल्प अधिकार्यांकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही
सामाजिक कार्यकर्ते रवी कास्देकरांनी मुलींना पालकांकडे स्वाधीन केले
चिखलदरा/14 ऑगस्ट : मेळघाटातील गौरखेडा कुंभी येथील अनुदानित आश्रमशाळेच्या 2 मुली अचानकपणे रात्री 2 वाजता बिहाली घाटातील किर्रर जंगलातून पायपीट करत जात असतांना एका पीकअप चालकाच्या नजरेत आल्यामूळे मोठा अनर्थ टळला. अत्यंत संतापजनक व अंगावर काटा आणणारी ही घटना वाचकांना देतांना महाराष्ट्र कुठे चालला असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासकीय अनुदानाचा मलीदा लाटणार्या गौरखेडा कुंभी या अनुदानित आश्रमशाळेत मुल- मुली आहेत. गुरुवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास या आश्रमशाळेतील 2 मुली अचानक बेपत्ता झाल्या व त्या मुली हिंस्त्र श्वापदांचा प्रचंड वावर असलेल्या बिहाली घाटातील रस्त्यावरून जात होत्या. दरम्यान कोरडा येथील रवी कास्देकर उर्फ भिलटबाबा या नावाने प्रसिध्द असलेले पीकअपचालक वाहनातून याच मार्गावरून चालले होते तेव्हा त्यांना 2 लहान मुली रस्त्यावर दिसल्या आणि त्यांच्या अंगावर थरकाप उडाला. भिलट बाबाने तत्काळ गाडी बाजुला घेतली व त्या दोन्ही मुलींना पटकन उचलून गाडीत बसविले. कोणत्याही क्षणी त्या मुलींचा श्वापदांनी बळी घेतला असता. रवी कास्देकर बाबांच्या अंगाच पाणी पाणी झालं त्यांनी मुलींची विचारपूस केली तेव्हा त्या मुलींनी पिपल्या गावचे असल्याचे सांगितले. कास्देकरांनी थेट कोरडा या गावी नेले व तिथे त्यांच्या पत्नीने घाबरलेल्या मुलींना जेवन दिले, धीर दिला व रात्रीच पालकांचा शोधा शोध सुरु केला. सकाळी 5 वाजताच्या सुमारास भीलट बाबाने त्या मुली पालकांच्या स्वाधीन केल्या. आपल्या चिमुरड्या मुली सुखरुप पाहून पालक रामू जामूनकर आणि रामलाल कास्देकर यांच्या डोळ्यात अश्रू तराळले.
गौरखेडा कुंभी येथील अनुदानित आश्रमशाळेतून रात्री 2 वाजता मुली गायब झाल्याच कश्या हा प्रश्न पालकांनी विचारला. जर त्या मुलींना रवि कास्देकर भेटले नसते तर त्या मुली आज कुठे असत्या? हिंस्त्र श्वापदांचा वावर असलेल्या या जंगलात आज त्या मुली राहील्या असत्या काय? आश्रमशाळेला अधिक्षक, मुख्याध्यापक, सुरक्षारक्षक, स्वयंपाकी, पर्यवेक्षक, शिक्षक अशी सगऴी व्यवस्था असतांना त्यांच्या नजरेआड एवढीमोठी घटना घडलीच कशी? आश्रमशाळेला सीसीटीव्हीची व्यवस्था आहे तरीही मुली आश्रमशाळेबाहेर गेल्या कश्या याचा शोध घेण्याची गरज आहे.
गौरखेडा कुंभी अनुदानित आश्रमशाळेतील ही भयंकर घटना घडल्यानंतर पालकांना शिक्षण व आदिवासी प्रकल्पांशी संपर्क केला मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे कळते.




