अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करणार

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, 82,000 हून अधिक शेतकरी बाधित

मुंबई/5एप्रिल- गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे आणि ज्यांना आर्थिक फटका बसला आहे, त्या सर्व शेतकर्‍यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वाूसन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, 1.22 लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, सरकार बाधित सर्व शेतकर्‍यांना मदत पुरवेल. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस किंवा गारपीट होते, तेव्हा
आम्ही पाहणी करतो आणि नुकसानभरपाई देतो. यावेळीही तसेच केले जाईल. उत्तर महाराष्ट्र, तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत या अवकाळी पावसाचा फटका तीव्र स्वरूपाचा बसला असून, यामुळे 82,000 हून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत.नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळ बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे या पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये समाविष्ट आहेत. या जिल्ह्यांमध्ये शेतात उभी असलेली तसेच कापणी करून ठेवलेली रब्बी पिके मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहेत. गहू, हरभरा, ज्वारी आणि बाजरी यांसारखी कापणीसाठी सज्ज असलेली पिके अनेक ठिकाणी भुईसपाट झाली आहेत, तर द्राक्षे, डाळिंब आणि आंबा यांसारख्या फळबागांमधील फळे मोठ्या प्रमाणावर गळून पडली आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची नोंद झाली आहे, अस त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button