बच्चू कडू जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
उपोषण स्थगितीनंतर लगेच कारवाई

-विभागीय सहनिबंधकांनी काढले आदेश
-अमरावतीचे राजकारण तापले
अमरावती / 16 जून: माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या आठवड्यात गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह केला. सात दिवसांनंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बच्चू कडू यांच्यावर अद्याप उपचार सुरु असतानाच आता त्यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात आल्याची कारवाई करण्यात आल्याने अमरावतीच्या राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आजच्या या कारवाईनंतर ेबच्चू कडू यांनी सरकारच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करुन प्रामुख्याने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे या कार्यवाहीशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या घडामोडीमुळे अमरावती जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि बच्चू कडू यांच्या समर्थकांकडून सरकारवर यासंबंधाने टीका केली जात आहे. हेतूपूरस्सर ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बच्चू कडू हे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष आहेत. विभागीय सहनिबंधकांनी त्यांचे संचालक पद अपात्र ठरविले आहे. त्यामुळे ते अध्यक्षपदावरूनही अपात्र झाले आहेत. बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 11 संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडू यांना एका प्रकरणात एका वर्षाची शिक्षा सुनावली असल्याचा दाखला त्यांनी यामध्ये दिला होता. याचा आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी आपणास अपात्र का करण्यात येऊ नये, तसेच पुढील पाच वर्षाकरीता आपणास सदरचे पद धारण करण्यास अपात्र का करू नये? अशी नोटीस बच्चू कडू यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात बजावण्यात आली होती.
2017 मध्ये नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आणि मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या विशेष न्यायालयाने 2021 मध्ये बच्चू कडू यांना एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार बँकेचा सदस्य कुठल्याही गुन्ह्यासाठी एक वर्षापेक्षा कमी नाही, इतक्या कालावधीच्या कारावासासाठी सिद्ध अपराधी ठरला असेल, तर तो सदस्यपदावर राहण्यास पात्र राहणार नाही, अशी तरतूद असल्याने त्याआधारे बच्चू कडू यांना अपात्र ठरवले जावे, अशी मागणी करण्यात आली होती.
हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले. तिथून पुढे सर्वोच्च न्यायालयात पोहचले. सर्वोच्च न्यायालयाने अविश्वास ठरावाला स्थगिती दिली होती. या प्रकरणी विभागीय उपनिबंधकांकडे सुनावणी सुरू होती. या दरम्यान विभागीय उपनिबंधकांनी आज बच्चू कडू यांना संचालकपदावरून अपात्र घोषित केले आहे. आदेशाच्या दिनांकापासून संचालक मंडळाचा कालावधी समाप्त होईपर्यंत समितीचा सदस्य म्हणून पुन्हा नेमणूक केली जाण्यास. पुन्हा नामनिर्दिष्ट होण्यास किंवा पुन्हा निवडून येण्यास पात्र असणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
-भाजपचा संबंध नाही : आ. प्रवीण तायडे
बच्चू कडू यांना जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय हा जिल्हा विभागीय सहनिबंधकांनी घेतलेला आहे. त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. काँग्रेसच्या संचालकांनी त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. हे जुने प्रकरण आहे. त्याचा बच्चू कडू यांनी केलेल्या उपोषणाशीही संबंध नाही, असे अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी म्हटले आहे.
-सूडबूद्धीने कारवाई!
आपल्याला जिल्हा बँकेच्या संचालक पदावरून अपात्र ठरविण्यात आले, हे आपल्याला सर्वप्रथम माध्यमांकडूनच कळले. मला अपात्र ठरवले जाते आणि त्याची साधी नोटीसही आपल्याला दिली जात नाही, याचे आश्चर्य वाटते. आपल्यावरील ही कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आली आहे. काँग्रेसच्या काही संचालकांनी आपल्याला अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यांचा वापर करून भाजपने ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे. अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. नाशिक न्यायालयाच्या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या आदेशाची ही अवमानना आहे का, हे तपासले जाईल. लवकरच आपण याविषयी विस्तृत माहिती जनतेसमोर मांडू असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
-मला संपविण्याचा भाजप-कॉग्रेसचा डाव
बच्चू कडू म्हणाले, आपण सरकारच्या विरोधात बोलू नका, अन्यथा आपल्याला कुठेतरी अडकविण्याचा प्रयत्न केला जाईल, येत्या काही महिन्यात बच्चू कडूला संपवायचे, असे विरोधकांनी ठरविल्याची माहिती आपल्याला एका अधिकार्याने दिली होती. ही एक प्रकारे धमकीच होती. हे आपल्याला अपेक्षितच होते. आपला आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे, पण आपण आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे बच्चू कडू यांनी सांगितले. ही काँग्रेस आणि भाजपने मिळून केलेली ही कारवाई दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला.