अज्ञात ट्रकने मध्यरात्री दिली तीन दुकानांना धडक
व्यावसायिकांचे मोठे नूकसान, मोर्शीतील घटना

मोर्शी / 16 जून: सुसाट वेगाने एका अज्ञात ट्रकने मोर्शी शहरातील गजबजलेल्या जयस्तंभ चौकात रस्ता दुभाजकाजवळ असलेल्या तीन दुकानाच्या टिनाच्या शेडला व एका पान टपरीला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे दुकानदारांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मोर्शी शहरात जयस्तंभ हा गजबजलेला चौक असून या ठिकाणी नेहमी नागरिकांची मोठी वर्दळ असते. येथून चांदूरबाजार, परतवाडा, वरुड तसेच ग्रामीण भागात जहाणारी वाहने सुसाट वेगात धावतात त्यामुळे येथे कधीही मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावर तहसील, पोलीस स्टेशन, महाविद्यालय, शाळा यासह विविध कार्यालय असल्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. मागील काही महिन्यापासून या रस्त्यावरूनच अवैध रेती भरलेले ओव्हरलोड ट्रक तसेच अवैधरीत्या जनावरांची तस्करी करणारी वाहने रात्रीच्या सुमारास सुसाट वेगाने पळविली जात असल्याचे प्रकार समोर आले आहे.
सकाळच्या वेळेस या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत असणे गरजेचे असून शहरातून जाणार्या या वाहनाच्या वेगावर मर्यादा लावण्यात याव्या. अशी मागणी या निमित्ताने होत आहे. मोर्शी शहरात अवैध प्रवाशी वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यावर सुद्धा बंदी घालण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.