प्रकृतीचा विचारकरून उपोषण मागे घ्या

आ.संजय खोडके व आ.सुलभा खोडके यांची बच्चू कडू यांना आवाहन

अमरावती : शेतकर्‍यांच्या प्रश्नांना घेऊन प्रहार नेता बच्चूभाऊ कडू यांचे मोझरी येथे गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली असल्याने सर्वपक्षीय स्तरावर त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. दरम्यान आज शुक्रवार दिनांक 13 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आ.संजय खोडके व अमरावतीच्या लोकप्रतिनिधी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी मोझरी येथे बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी आ.संजय खोडके यांनी उपोषणकर्ते बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडून सुद्धा बच्चू कडूंच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली असून अशा शेतकर्‍यांच्या लढवय्या नेत्याची अमरावती जिल्ह्याला खरंच गरज आहे. त्यामुळे त्यांनी शेतकरी प्रश्नी आंदोलनाचा लढा सुरूच ठेवावा, परंतु प्रकृतीचा विचार करता उपोषण मागे घ्यावे,अशी विनंती आ.संजय खोडके यांनी केली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांना घेऊन सुरु असलेल्या बच्चूभाऊंच्या लढ्यात आपण सहभागी असल्याचे सांगितले. मात्र उपोषणाचा मार्ग न अवलंबता आपण शासन दरबारी व मंत्रालय स्तरावर आंदोलन करून शेतकर्‍यांच्या प्रश्नांना न्याय देऊ. उपोषण सुटले तरी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरु राहील, परंतु बच्चूभाऊंनी उपोषणाचा आग्रह सोडावा , आणि आपल्या प्रकृतीचा विचार करून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button