भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा मृत्यू

मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

मलकापूर/22 डिसेंबर – नागपूर राष्ट्रीय महामार्ग 56 वर मलकापूरजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघेजण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
धुपेश्वरहुन मलकापूरकडे येणारी कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकून हा भीषण अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या झाडाला जोरदार धडकली. यात तिघांचाही जागेवर मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 वर धुपेश्वर होऊन मलकापूरकडे येणार्‍या कारचा भीषण अपघात झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय . या अपघातात रुद्र उमेश पवार, विनायक जनार्दन अत्तरकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत राजू वडारे गणेश दीपक इंगळे आणि तक्ष धुरंधर हे तिघे गंभीर जखमी झाले होते. तिघांनाही पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गणेश दीपक इंगळे या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा तिघांवर पोहोचला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन हटवून घटनेचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासात अतिवेग आणि नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केल.या भीषण अपघातामुळे मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button