भाजपकडे एवढे पैसे आले कुठून
नगरपरिषदेतील लक्ष्मीदर्शनावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक

* निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही आक्षेप
नवी दिल्ली/9 डिसेंबर – नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाले एवढे पैसे भाजपकडे कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही निवडणूक लढता येते पण महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्नी, आई विरोधात निवडणूक लढता येत नाही अशी अवस्था आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत पैशांच्या थैल्या उघड झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांच्या घरात नोटांचे बंडल असलेल्या थैल्या सापडल्या, भाजपकडे एवढे पैसे आले कुठून असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात निवडणूक सुधारणांवर आयोजित चर्चा करत असताना केला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची चर्चा यानिमित्ताने देशाच्या सर्वोच्च सभागृहात झाली. निवडणुका निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पडल्या पाहिजे, ही भारतीय संविधानाची अपेक्षा आहे. या बद्दल संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधान सुप्रिया सुळे यांनी कोट केले. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या बहुमताचे सरकार आले आहे. 200 हून अधिक आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. असे असतानाही नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या संपूर्ण निवडणुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले. निवडणुकीच्या आरक्षणामध्ये गडबड झाली. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यातही गडबड झाली. अर्ज मागे घेण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल करण्यात आली. निवडणुकीत पैसे वाटण्यात आल्याचे सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराने उघड केले. भाजपच्या पदाधिकार्याच्या घरातून रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही एक घटना नाही तर अशा दहा घटना मी मोजून दाखवू शकते. या सर्व घटनांवर निवडणूक आयोग कुठे आहे, ते शोधूनही सापडत नाही. महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे की नाही हाच प्रश्न आहे. असेल तर त्यांच्या तोंडाला कुलूप लागलेले आहे, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर केला.महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या इतिहासात एवढी मारहाण आणि हिंसाचार आजपर्यंत कधी झालेला नाही. गाड्या फोडण्यात आल्या, लोकांना मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमचेही कुलूप तोडण्यात आले.आमच्याकडे रोख रक्कम नाही, मात्र सगळी रोकड ही भाजपकडे जमा झाली आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत बॅगमध्ये नाही तर मोठमोठ्या सुटकेसेसमध्ये पैसे आढळून आले. त्याचे व्हिडिओ समोर आले. याची चौकशी सरकार केव्हा करणार आहे? महाराष्ट्रात एवढी मोठी कॅश कुठून आली, ईडी, सीबीआयकडून याची चौकशी झाली पाहिजे. असा सवाल खासदार सुळे यांनी केला.




