वसंतराव नाईक जयंतीनिमित्त पिंपरीत वृक्षारोपण
विद्यार्थ्यांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमरावती /5 ऑगस्ट : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत श्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना पर्यावरण संरक्षण, वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व तसेच अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. आज लावलेले झाड हे उद्याच्या पिढीचे जीवन आहे, असा संदेशही त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या समारोपानंतर विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील विविध ठिकाणी वृक्षारोपण केले. या उपक्रमात तनुष्का लांजेवार, प्रेरणा मेश्राम, श्रेया मुंदे, प्रेरणा पाचखंडे, पल्लवी खोटेले व निशा केंढे या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहकार्यामुळे हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




