5 हजार 29 कोटींची पहिली कर्जमाफी खात्यात
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, 6.22 लाख शेतकर्यांना दिलासा

आधार प्रमाणीकरण होताच पैसे जमा होणार
मुंबई /7 ऑगस्ट ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत आषाढी एकादशीला घोषित करण्यात आलेल्या पहिल्या यादीतील 6 लाख 22 हजार शेतकर्यांच्या खात्यात आज जवळपास 5 हजार 29 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. आधार ऑथेंटिकेशन पूर्ण केलेल्या सर्व शेतकर्यांचे कर्जखाते आता ’नील’ (नशीे) झाले आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी कर्जमाफी योजना, नाशिकमधील रस्ते आणि कुंभमेळ्याची कामे, तसेच राज्यातील इतर राजकीय आणि सुरक्षाविषयक घडामोडींवर सविस्तर भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, शेतकर्यांनी कर्जमाफीसाठी कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. ग्रामपंचायतींना पाठवलेल्या यादीनुसार शेतकर्यांनी फक्त आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून ऑथेंटिकेट करायचा आहे. मध्यंतरी बँकांनी आकारलेल्या एनपीए वरील अतिरिक्त व्याजामुळे कर्ज जास्त दिसत होते. मात्र, शासनाच्या सूचनेनुसार बँकांनी ते अतिरिक्त व्याज रद्द केले आहे. त्यामुळे शासनाने भरलेली रक्कम आणि शेतकर्यांच्या खात्यातील कर्जाची रक्कम समान झाल्याने खाती पूर्णपणे नील झाली आहेत. सध्या 18-19 लाख खात्यांची प्रक्रिया सुरू असून, 12 लाख खात्यांमध्ये काही तांत्रिक त्रुटी, नावांमधील तफावत किंवा दुबार नोंदणी असल्यामुळे ती बँकांकडे दुरुस्तीसाठी परत पाठवली आहेत. बँकांनी एका आठवड्यात ती दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले आहे. जसे शेतकर्यांचे आधार ऑथेंटिकेशन होईल, तसे टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचे पैसे जमा होतील. तसेच, या योजनेत कोणतेही ओटीएस नसल्यामुळे शेतकर्यांना ’सिबिल’ची कोणतीही अट लागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.




