तुम्हाला पैशाचं सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा
बच्चू कडू यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा

पुणे/12 ऑक्टोबर – माजी मंत्री बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार टीका केली. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आयोजित शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेत बोलताना कडू यांनी पवार यांच्या वक्तव्यांवरून आणि महामार्गासाठी दिलेल्या निधीवरून प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, कृषिमंत्री भरणे शेतकर्यांसाठी भांडताना दिसले पाहिजे, नुसते शेपूट हलवणारे नको. कडू यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या एका मागील वक्तव्याचा दाखला देत सांगितले की, ‘दादा’ एकदा म्हणाले होते पाणी नाही तर… धरणात काय… आणि खरोखरच तर वाहत जाईल, सापडणारही नाही, कोणत्या नदीत गेले, समुद्रात गेले, डोहात गेले, असं म्हणत त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. त्यांनी पुढे म्हटले की, सकाळी 7 वाजता उठून शपथ घेतली, पण एवढं सोंग कुणाला जमलं का दादा, कुठे गेली तुमची दादागिरी? वित्त खात तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही; जमत नसेल तर आम्हाला सांगा, मी सांगतो कसं सोंग करायचं, शक्तीपीठ महामार्गासाठी 85 हजार कोटी तुमच्या निधीतून दिले, आम्ही रस्त्यातील खड्ड्याने मरतोय. दादा, हे सोंग कसं जमलं तुम्हाला, कोणाच्या खिशातून पैसा काढला, किती लुटलं ते आम्हाला सांगा. माझा शेतकरी पाय घासून मरतोय, त्यासाठी पैसा नाही; तिथं तुम्हाला पैशाचं सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा, असेही त्यांनी दादांवर निशाणा साधला.
कृषिमंत्री नुसता शेपूट हलवणारा नको…
बच्चू कडू यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा कृषिमंत्री शेतकर्यांसाठी भांडताना दिसला पाहिजे. नुसता शेपूट हलवणारा नकोय आम्हाला, मागे माणिकराव कोकाटे कृषिमंत्री होते. ते ओबडधोबड बोलत होते. ते घरी गेले. भरणे थोडे बरे बोलतात, कमीत कमी ते चुका तरी करत नाहीत. मात्र शेपूट हलवणं बंद केलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा लगावला. तुम्ही कृषिमंत्री आहात.. सबसे ज्यादा ’भार तुम्हारी तरफ’ है… सर्वात जास्त संख्या शेतकर्यांची आहे, असंही कडू यावेळी म्हणाले.




