फोन करुन मोदींना एक तासात भेटून दाखवा
यशोमती ठाकूर सत्यजीत तांबेंवर भडकल्या

-राहुल गांधींवरील वक्तव्याने राजकारण तापलं
अमरावती / 28 मे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे तथा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे. अमरावतीच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सत्यजीत तांबे यांना चांगलच सुनावलं आहे. सत्यजीत तांबेंनी मोदींना फोन लावावा. याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणीही मोदींना फोन करावा, मोदीजींनी तासाभरात कुणाला अपॉइंटमेंट दिली, तर मग आम्ही पण तसंच बोलू शकतो, असा टोला ठाकूर यांनी आमदार तांबे यांना लगावला.
नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी अॅक्सेसेबल नाही, असा दावा करताना, महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यानं एका तासांत त्यांची भेट घेऊन दाखवावी, असे म्हणत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना चॅलेंज केलं होतं. आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या या विधानावरून राज्यात चांगली राळ उडाली आहे. एनएसयुआयचे अध्यक्ष अमीर शेख यांनी सत्यजीत तांबेंवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर आता अमरावतीच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी देखील सत्यजीत तांबे यांच्या या विधानावर संतापल्या आहेत.
यशोमती ठाकुर म्हणाल्या, सत्यजीत तांबे काँग्रेसचे आहेत आणि आता ते अपक्ष निवडून आलेत. सत्यजीत तांबे यांनी मोदींना फोन लावावा. याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणीही मोदींना फोन करावा, मोदीजींनी तासाभरात कुणाला अपॉइंटमेंट दिली, तर मग आम्ही पण तसंच बोलू शकतो. राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात भेट देतात..प्रत्येक पक्षाचा आपापला प्रोटोकॉल असतो, असे देखील यशोमती ठाकुर यांनी म्हटले आहे.
प्रत्येक पक्षाचा वेगवेगळा प्रोटोकॉल असतो. तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो. तसा करावा देखील लागतो. राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये भेटतात, बोलतात आणि समन्वय देखील साधला जातो. ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केलाय, अलिप्त राहण्याचा विचार केलाय, त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला देखील यशोमती ठाकुर यांनी सत्यजीत तांबे यांना लगावला.