कृषी विज्ञान केंद्र घातखेड करणार शेतकर्यांचा ’कृषी संकल्प विकसित’
कृषी संकल्प अभियान चा शुभारंभ

-जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार तज्ञांचे मार्गदर्शन
अमरावती /28 मे: कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या माध्यमातून देशभरातील शेतकर्यांसाठी 29 मे ते 12 जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. श्रमसाफल्य फाउंडेशन द्वारा संचालित कृषि विज्ञान केंद्र घातखेड चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अतुल कळसकर यांनी या अभियानाची माहिती दिली. मागील अनेक दशकांपासून कृषि विज्ञान केंद्र घातखेड जिल्ह्यातील शेती व शेतकर्यांकरिता एक मार्गदर्शक म्हणून यशस्वी भूमिका व कार्य करीत आहे. खरीप व रब्बी हंगामापूर्वी शेतकर्यांना अत्याधुनिक व शाश्वत शेतीविषयक फायदेशीर माहिती कळावी, या उद्देशानें हे अभियान राबविण्यात येणार आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये विकसित कृषि संकल्प अभियान यशस्वीपणे कृषि विज्ञान केंद्र, घातखेडच्या कार्यक्षेत्रात सुद्धा राबविण्यात येणार आहे. यासाठी शास्त्रज्ञांच्या दोन चमू गठीत करण्यात आल्या आहेत. विषय विशेषज्ञ कृषी विस्तार अमर तायडे यांचे नेतृत्वात एक चमु धारणी, चिखलदरा, अचलपूर व चांदूरबाजार या तालुक्याकरिता तसेच दुसरी चमु विषय विशेषज्ञ, उद्यान विद्या, डॉ. अतुल फुसे यांचे नेतृत्वात तिवसा, चांदुर रेल्वे, धामणगाव रेल्वे या तालुक्यात दिनांक 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान कार्यरत राहणार आहे. या चमू सोबत केंद्रीय संशोधन संस्थेचे तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, राज्य शासनाच्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी, आत्माचे तसेच कृषी संलग्न विभागांचे क्षेत्रीय कर्मचारी सुद्धा उपस्थित राहून शेतकर्यांकरिता शासनाच्या असलेल्या विविध योजनांच्या बाबत जाणीव जागृती करणार आहे.
या अभियाना दरम्यान कृषि विज्ञान केंद्र घातखेड चे अनुभवी शास्त्रज्ञ शेतकर्यांना भेडसावत असणार्या समस्यांवर उपाययोजना सुचवून संशोधनाबद्दल शेतकर्यांच्या अपेक्षा सुद्धा समजून घेणार आहेत. कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांना देण्यात येणार्या विविध सेवांविषयी तसेच उपलब्ध निविष्ठांची माहिती कृषि विज्ञान केंद्र घातखेड कडून शेतकर्यांना थेट त्यांच्या गावामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे दृष्टीने शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र घातखेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अतुल पुरुषोत्तमराव कळसकर यांनी शेतकर्यांना केले आहे.
शेतकर्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन
या अभियानात शेतकरी मेळावे, चर्चासत्रे, कार्यशाळा, जनजागृती उपक्रम, शेतकरी संमेलनांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकर्यांना दिली जाणार आहे. एकंदरीत, हा एक व्यापक व व्यावहारिक उपक्रम आहे. त्यातून खरीप हंगामासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे उत्पादनवाढीसाठी व शाश्वत शेती करता येणार आहे. शेतकर्यांनी या अभियानाचा फायदा घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अतुल कळसकर यांनी केले आहे.