विकास करार रद्द झाल्यास मुद्रांक शुल्क परतावा बंद
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सादर केले विधेयक
महसुलाचे नुकसान टाळणे अन् तरतुदींचा गैरवापरासाठी निर्णय
मुंबई/30 जून- विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद असलेली महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 48 मध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा करणारे विधेयक आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे आणि कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर रोखणे हा या सुधारणेचा मुख्य उद्देश आहे.
वाढते दावे आणि प्रशासकीय अडचणी-प्रत्यक्ष व्यवहारात असे निदर्शनास आले आहे की, विकास करारांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरले जाते. तथापि, व्यावसायिक कारणांमुळे किंवा परस्पर मतभेदांमुळे हे करार पुढील टप्प्यावर रद्द, निरस्त किंवा समाप्त केले जातात आणि त्यानंतर भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्यासाठी शासनाकडे अर्ज सादर केले जातात. अशा प्रकरणांमध्ये तथ्य पडताळणी करताना प्रशासकीय अडचणी निर्माण होतात आणि परताव्याचे अनेक दावे वाढतात.
मुद्रांक शुल्क आकारणीचा नियम-मुद्रांक शुल्क हा दस्ताच्या अंमलबजावणीवर आकारला जातो; कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली किंवा नाही, यावर तो अवलंबून नसतो. त्यामुळे करार रद्द झाला तरी अशा प्रकरणांमध्ये परतावा देणे महसुली दृष्ट्या राज्यासाठी प्रतिकूल व नुकसानकारक ठरत होते. तसेच कायद्यातील सवलतींच्या तरतुदींचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
कायद्यात होणार नवीन ’स्पष्टीकरण’ दाखल-राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे तसेच कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात एकसमान व स्पष्टपणे व्हावी, यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 48 मधील परंतुका नंतर सदर परंतुकाची शिथिलता किंवा परताव्याची तरतूद ही ’करारनाम्याप्रमाणेच’ समान मुद्रांक शुल्क लागू होणार्या विकास करारासह इतर कोणत्याही दस्तांना लागू होणार नाही. अशी नोंद करण्यात येणार आहे




