चारचाकीची दुचाकीला धडक : एकाचा जागीच मृत्यू
दोन गंभीर?, चांदूर बाजार ते बोराळा मार्गावर भीषण अपघात

दुचाकीवरील तिन्ही पुरुष रिद्धपूरचे रहिवासी; चारचाकीचा चालक पसार
अमरावती /7 जून- चांदूर बाजार ते बोरला मार्गावर भरधाव चारचाकीने दोन चाकी वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीचा पूर्ण चक्काचूर झाला असून रिद्धपूर येथील रहिवासी सलीम भाई यांचा जागीच अंत झाला. तर ताज नगरचे रहिवासी वसीम अली आणि आरिफ भाई हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक वाहन सोडून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार परिसरात रात्रीच्या वेळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. रिद्धपूरचे रहिवासी सलीम भाई हे वसीम अली आणि आरिफ भाई यांच्यासोबत दोन चाकी वाहनाने गावाकडे जात होते. चांदूर बाजार ते बोरला रस्त्यावरून जात असताना मागून येणार्या एका वेगवान चारचाकी गाडीने त्यांच्या वाहनाला जोरदार उडवले. ही धडक एवढी भयानक होती की वाहनाचा जागीच चेंदामेंदा झाला. या अपघातात गंभीर मार लागल्याने सलीम भाई यांनी जागीच प्राण गमावले. तर गाडीवरील वसीम अली आणि आरिफ भाई हे रक्ताच्या थारोळ्यात पडले.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील आणि गाव-खेड्यातील लोक तातडीने मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी जखमींना उचलून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून अपघात करून पळून गेलेल्या वाहन चालकाचा कसून शोध सुरू केला आहे.




