नाकारलेले लोक दिल्लीत जाऊन आगीत तेल ओतत होत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उध्दव ठाकरेंसह काँग्रेसवर टीका

मुंबई/26 जुलै– विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर करून देशात आणि महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव जनतेने हाणून पाडला, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर दादरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने केलेल्या जल्लोषावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (26 जुलै) जोरदार प्रतिहल्ला चढवत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली. मुंबईमध्ये नेस्को सेंटर येथील कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, नीट पेपर लीक ही देशासाठी अत्यंत दुर्दैवी घटना होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांच्या भवितव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. कठोर कायदा आणण्याचा निर्णय घेतला. दोषींना दहा वर्षांची सक्त शिक्षा, दहा कोटी रुपयांपर्यंत दंड,फास्ट ट्रॅक न्यायालयात खटले आणि कोणालाही अभय नाही, ही मोदी सरकारची स्पष्ट भूमिका आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, आंदोलन जंतर-मंतरवर सुरू असताना पंतप्रधानांच्या निवासस्थानावर हजारो लोकांना घेऊन जाण्याचा उद्देश काय होता?दिवंगत इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी कायदा करण्यात आला. पंतप्रधानांच्या निवासस्थानाभोवती आंदोलनास बंदी आहे, हे विरोधी पक्षनेत्याला माहिती असतानाही जाणीवपूर्वक तेथे गर्दी जमवण्यात आली. हा निषेध नव्हता, तर देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच बांगलादेश, श्रीलंका आणि इतर देशांप्रमाणे भारतातही अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव होता. मात्र देशातील जनतेने तो पूर्णपणे उधळून लावला




