धरतीआबा अभियानातून गरजू आदिवासींना लाभ द्यावा

खा.बळवंत वानखडे यांचे आवाहन

अमरावती /4 मार्च : जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या आदिवासीबहुल तालुक्यासाठी धरतीआबा अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांतून नागरिकांच्या विकासासाठी योजना राबविण्यात येतात. मात्र या योजनेतून आदिवासींना प्राधान्य देऊन योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे धरतीआबा अभियानातून गरजूंना लाभ द्यावा, असे आवाहन खासदार बळवंत वानखडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणीचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
आदिवासी क्षेत्रासाठी प्रामुख्याने घरकुलांची योजना राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे या अभियानात असलेल्या 304 गावातील घरकुलासाठी पात्र असलेल्या नागरिकांची यादी तयार करावी. गावात जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता तयार करण्यासाठी ग्राम सडक योजनेतून रस्ते प्रस्तावित करावेत. वनक्षेत्रात नवीन रस्ते तयार करण्यासाठी अडचणी येत असल्याने अस्तित्वात असलेले रस्त्यांचा दर्जा योग्य राखण्यात यावा. तसेच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने पाणीपुरवठ्याच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात.
मेळघाटातील 22 गावांचा विजेचा प्रश्न आहे. यातील तीन गावांमध्ये सौर ऊर्जा कार्यान्वीत झाली आहे. मात्र देखभाल दुरूस्तीअभावी येथील यंत्रणा बंद आहे. त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करून दुरूस्ती करण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येत आहे. या कार्डच्या वाटपाला मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गती देण्यात यावी. यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त मोबाईल व्हॅन घेण्यात याव्यात. आरोग्य सेवा देताना त्याठिकाणी मुबलक औषध पुरवठा ठेवण्यात यावा. यासोबतच पोषण आहार, कौशल्य विकास, पशूधन. वीज पुरवठा आदींचा आढावा घेण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button