अकोटमधील भाजपा-एमआयएम सोबतची युतीवर तुटली
मुख्यमंत्र्यांच्या नाराजीवरुन काहीतासातच निर्णय

* प्रदेशाध्यक्षांनी आ.भारसाकळे यांना बजावली नोटीस
* राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अकोला /7 जानेवारी – राजकारण व विचारधारेचे कट्टर विरोधक भाजप आणि ‘एआयएमआयएम’ पक्षांचे नगरसेवक सत्ता समीकरणासाठी अकोट विकास मंचाच्या नावावर एकत्र आणण्याचा प्रताप अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भिन्न विचारधारेमुळे युती शक्य नसल्याचे दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट केले. पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरुंग लावणार्या आमदार भारसाकळे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नोटीस बजावून खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत. भाजप व ‘एआयएमआयएम’च्या कथित युतीवरून राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडाला. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली. हे सगळे घडवून आणण्यामागे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे असल्याचे समोर आले. अकोट नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदावर भाजपच्या माया धुळे विजयी झाल्या. नगरसेवक पदाच्या 33 पैकी 11 जागांवर भाजप, काँग्रेस सहा, शिवसेना एक, वंचित व राष्ट्रवादी दोन, ‘एआयएमआयएम’ पाच, शिवसेना ठाकरे गट दोन, राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळाली. कुणाकडेही बहुमत नसल्याने अकोट विकास मंचाची स्थापना भाजपने केली. यामध्ये ‘एआयएमआयएम’चे पाच नगरसेवकही सहभागी झाले होते.
शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा देखील त्यात सहभाग आहे. या नव्या आघाडीची नोंदणी अकोला जिल्हाधिकार्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करून या प्रकारे आघाडी केली असल्यास ती तोडण्याचे आदेश दिले. ‘एआयएमआयएम’नेही भाजपसोबत युती केली नसल्याचे सांगितले. संबंधित नगरसेवकांनी दिलेला पाठिंबा विनाअट परत घेत असल्याचे पत्र अकोट नगर विकास मंचला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या स्वाक्षरीने पाठवले.




