मृगाच्या पहिल्याच दिवशी कोल्ह्याची हुलकावणी

शेतशिवार पेरणीसाठी सज्ज

अमरावती /8 जून: यंदा मान्सून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच धडकला. राज्यभर धुव्वाधार होता. शेतकर्यांनी शेतीची मशागत आणि बियाण्यांची जुळवाजुळव करून घेतली. मृगनक्षत्राच्या रविवार 8 जून रोजी पहिल्या दिवशी पाऊस येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, मृगाच्या पहिल्याच दिवशी वाहन असलेल्या कोल्ह्याने पावसाची हुलकावणी दिली. यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने थैमानघातले आहे.तर मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. या पावसामुळे भुईमूग, आंबे, पपई, ज्वारी, कांदा, मका, तीळ आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पावसाने सवड घेताच शेतकर्यांनी शेतमशागतीची कामे पूर्ण केली. खते, बी-बियाण्यांची जुवळाजुवळ केली. मृगनक्षत्राच्या पहिल्या दिवशी पाऊस हजेरी लावेल, अशी शेतकर्यांना आशा होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. एवढेच नव्हे तर कानपट शेकेल असे उन्ह होते. मृगनक्षत्राला जेमतेम सुरूवात झाली आहे. पुढे पाऊस येईल, अशी शेतकर्यांना आशा आहे. मृगाची पेरणी धन्यधान्य देई ही परंपरा कायम राहील, असे शेतकरी बोलत आहेत. कारण मृगनक्षत्रात पेरणी झाल्यास उत्पादन अधिक होते. यामुळे प्रत्येक शेतकरी मृगात पाऊस आल्यास पेरणीची घाई करीत असतो. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी ही महत्तवाची पिके घेतली जातात. 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांनीच अल्प पावसात पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पेरणी झाल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते.

संबंधित बातम्या

Back to top button