महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा मुहूर्त ठरला?
48-29-22 चा फॉर्म्युला निश्चित; मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यादीवर करणार शिक्कामोर्तब

मुंबई /13 जुलै: राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून रखडलेल्या आणि सत्ताधारी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा लागून राहिलेल्या ’शासकीय महामंडळ’ वाटपाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. महायुतीमधील धुसफूस टाळण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला असून, भाजपसह मित्रपक्षांच्या नेत्यांना महामंडळांचे जागावाटप महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, तिन्ही पक्षांमध्ये 48-29-22 असा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आगामी बैठकीत यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर आता अंतिम यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमधील संख्याबळ लक्षात घेऊन महामंडळांचे वाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, भाजप 48 टक्के महामंडळे, शिवसेना 29 टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 22 टक्के महामंडळे दिली जातील. विशेष म्हणजे महायुतीमधील एका छोट्या पक्षालाही 1 टक्के जागांवर सामावून घेतले जाणार आहे. दरम्यान, कोणत्या पक्षाला नेमके कोणते महामंडळ (उदा. सिडको, म्हाडा, एसटी) मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले, तरी मुख्यमंत्र्यांसोबतच्या उच्चस्तरीय बैठकीत कोणत्या महामंडळावर कोणाची वर्णी लावायची, याचे अंतिम वाटप नावांसह निश्चित केले जाणार आहे.




